Tuesday, October 7, 2014


स्वच्छता अभियान झिंदाबाद!

आर्याचे मूळ वसतीस्थान कोणते इथपासून ते हा देश नेमका कोणाचा आहे इथपर्यंत अनेक मतमतांतरे आहेत. या बाबत जहाल राजकीय मत-प्रणाली हिरिरीने मांडल्या गेल्या आहेत. पण तसला कोणताही सिध्दांतमांडणारे राज्यशास्त्राचे वा समाजशास्त्राचे हे सारे तथाकथित विव्दान एकजात चूक आहेत, असा माझा स्वतःचा लाडकासिध्दांत आहे. कोणताही देश हा त्यातल्या बहुसंख्याकांचा असतो हा दावा खरा मानला तर हा देश आहे कोणीही, कुठेही बिनदिक्कत थुंकणाऱ्याचा! हा देश आहे घरातला कचरा बेमालूमपणे (वा राजरोससुध्दा) रस्त्यावर ढकलून देणाऱ्यांचा! हा देश आहे रस्त्यावरच नाईलाजपणे (वा निष्काळजीपणे!) देहधर्म उरकणाऱ्यांचा! हा देश आहे रस्त्यावर मोफाट जनावरे सोडणाऱ्यांचा आणि सार्वजनिक जागांवर निर्ल्लजपणे आक्रमण करणाऱ्यांचा! थोडक्यात म्हणजे हा देश आहे सारे नागरीकशास्त्र गुंडाळून ठेऊन, सार्वजनिक स्वच्छतेची व सार्वजनिक संपत्तीची एैसी की तैसीकरणाऱ्यांचा!

आणि अशा या अव्दितीयजनतेनेच निवडून दिलेल्या शासनाला आता सार्वजनिक स्वच्छता अभियानचालवायचे आहे!

अशा वेळी मला शासनाबद्दल खरोखरच सहानुभूती वाटते. सहानुभूती हा शब्दसुध्दा येथे फारच थिटा आहे. मला सरकारची करूणा येते, कीव येते, माझ्या पोटात तुटते. मंडळी, तुम्हीच विचार करा की ही लढाई किती एकतर्फी आहे? त्या बापड्या अर्जुनाची अडचण एवढीच होती की त्याला केवळ आप्त-स्वकीयांशी लढावे लागणार होते. पण कौरवांच्या त्या अकरा औक्षणी (चूकभूल देणे घेणे) सैन्याला तोंड देण्यासाठी याच्याकडे निदान सात औक्षणी (पुन्हा एकदा चूक भूल देणे घेणे!) सैन्य तरी होतेच होते. म्हणजे त्याच्या हाती निदान तुटपुंजी कां होईना पण साधनसामग्री मौजूद होती आणि साऱ्या पापांची जबाबदारी घ्यायला पाठीशी खुद्द कृष्णपरमात्मा सिध्द होता. इथे एकल्या शासनाला हे युध्द केवळ आप्त-स्वकियांशीच नव्हे तर चक्क भावी मतदारांशीही लढायचे आहे. शिवाय हतो वा प्राप्यसी स्वर्गम्ची गॅरंटीदेणारे कोणी पाठीशी नाही ते नाहीच. कुरूक्षेत्र कितीही विस्तीर्ण होते म्हंटले तरी त्याच्या सीमा नजरेच्या टप्प्यात येत होत्या. इथे सारा खंडप्राय देशच या अभियानासाठी एक मोठे रणांगण आहे. शत्रू(?)सैन्य आहे सुमारे एक अब्ज! जे काय 5-10 कोटी कमी असतील ते काही दिवसातच भरून काढायचे अचाट कर्तृत्व जनतेच्या अंगी आहेच; आणि ज्या दुर्गुणांविरूध्द शासकीय कर्मचारी नावाच्या ज्या सैन्याच्या जोरावर ही लढाई लढायची, ते सारे सैन्य स्वतःच त्या साऱ्या दुर्गुणांनी लिप्त आहे, म्हणजे फार कडक कारवाई करायचे ठरवले तर प्रथम स्वतःच्याच अनेक सैनिकांना कंठस्थान घालावे लागणार अशी दशा!

देशाचा अफाट विस्तार आणि जनतेच्या हाडीमासी खिळलेल्या असंख्य घाणेरड्या सवंयी लक्षात घेतल्या तर केवळ कागदावर कायदे पास करून अथवा केवळ शासकिय कर्मचाऱ्यांच्या जीवावर हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविता येणार नाही. हां, एका दिवसासाठी, आठवड्यासाठी, पंधरवड्यासाठी, महोत्सवी स्वरूपात असे अभियान चालविता येईलही! पण तेवढ्यापुरतेच! कायमस्वरूपी हे स्वच्छता अभियान चालवायचे असेल तर त्यासाठी काहींतरी संपूर्णतः वेगळीच रचना करावी लागेल.

आणि अशी कोणतीही रचना करताना सर्वात पहिली अट असेल ती म्हणजे यासाठी शासनाच्या तिजोरीवर जादाचा भार पडता कामा नये. हंगामी वा कायम स्वरूपाची जादाची नोकरभरती त्याकरता अपेक्षित असता कामा नये. उपलब्ध मानवीबळात आणि उपलब्ध साधनसामग्रीतच योग्य तो परीणाम साधता आला पाहिजे. फार वर्षापूर्वी वऱ्हाडी माणंसनावाचे नाटक मी वाचले होते. त्यातल्या नाटकातील त्या वृध्द नोकराच्या, दाजीबाच्या भाषेत सांगायचे तर, ‘पदरातून इस्तू नेताना, पदर तर प्येटला नाई पायजे, इस्तू तर विझला नाई पाहिजे, आणि कुळवंतीची चाल त्या धगीने बिगडलीबी नाई पाहिजे.

तुम्हाला सुचतो असा कांही उपाय? उपलब्ध यंत्रणेवर जादा कामाचा बोजा न टाकणारा? तिजोरीवर जादा भर न टाकणारा? आणि तरीही इफेटिव्ह’!

मला सुचतो.

आपण स्वच्छता-निरिक्षकनावाची संपूर्ण नवी यंत्रणा उभारूया. पूर्णतः स्वतंत्र म्हणजे उपलब्ध सरकारी, निम-सरकारी नोकरांवरही जादा कामाचा भार नको अथवा सरकारी तिजोरीवरही जादाचा बोजा पडायला नको.

All great ideas are basically very simple या न्यायाने माझी ही कल्पनाही अगदी साधी सोपी आहे; माझ्या इतर कल्पना असतात तशीच! आणि शिवाय खासगीकरणाच्या या जमान्यात ती कालसुसंगतही आहे. आणि शिवाय सुशिक्षित बेकारांनाही त्यातून स्वयंरोजगार मिळेल.

सुशिक्षित बेकारांनी फक्त एवढेच करायचे की शासनाने ठरवून दिलेल्या पध्दतीचा गणवेश त्यांनी स्वखर्चाने शिवून घ्यायचा. स्वखर्चाने हं, म्हणजे शासनाला गणवेशाचा देखील खर्च नाही. अशा सर्व गणवेशधारकांना शासनाने एक ओळखपत्र आणि नेमणूकपत्र द्यायचे. कामाचे स्वरूप आणि कार्यकक्षा ठरवून द्यायची. शासकिय सहीशिक्याचे एक पावतीपुस्तक त्यांच्या हाती द्यायचे. बस्स, एवढाच काय तो शासनाचा खर्च! फारतर या स्टेशनरीचे पैसे सुध्दा शासनाने यांच्याकडूनच वसूल करावेत. आणि हो, नियमभंगाबाबत आकारण्याच्या दंडाच्या अधिकृत दरपत्रकाची एक प्रत मात्र शासनाने त्यांना पुरवायची. वर्तमानपत्रे, टीव्ही आणि वेबपेजसारख्या माध्यमातून त्या दरपत्रकाला सतत प्रसिध्दीही द्यायची.

म्हणजे पहा हं, कार्यकक्षा म्हणजे नेमक्या कोणत्या हद्दीत त्या त्या निरिक्षकाचा अधिकार चालेल हे स्पष्ट असेल. कामाचे स्वरूप म्हणजे त्याने नेमक्या कोणत्या नियमभंगाबद्दल कारवाई करायची हे स्पष्ट असेल. त्यापलीकडे कोणत्याही बाबतीत त्याचा अधिकार चालणार नाही. त्या प्रत्येकाच्या अंगावर गणवेश, ओळखपत्र, नेमणूकपत्र आणि अधिकारपत्र असे सारेच असल्याने कोणी तोतयेगिरीही करू शकणार नाही अथवा कोणी त्याच्या अधिकाराला आव्हान देण्याच्या भानगडीत पडणार नाही. नियमभंग करताना त्याने कोणाला पकडले तर छापील दरपत्रकाप्रमाणे दंड वसूल करून सरकारी पावती देण्याची त्याच्यावर जबाबदारी असेल.

म्हणजे आता काय होईल पहा हं. रस्त्यावर कोणी माणूस थुंकताना, केर टाकताना, अथवा अन्य मार्गाने घाण करताना आढळला तर त्या व्यक्तीला हा निरिक्षक जागच्या जागी दंड करेल. पावती देईल. समजा, रस्त्यावर थुंकण्याचा दंड म्हणून 10 रूपये जमा झाले तर हा निरिक्षक संध्याकाळी त्यातले पाच रूपये सरकारी तिजोरीत भरेल 5 रूपये कोणी इश म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी सत्यनारायण म्हणतात या धर्तीवर, स्वतःचे कमिशनम्हणा, ‘पगारम्हणा, ‘मेहनतानाम्हणा, ‘कमाईम्हणा, ‘भरपाईम्हणा, या नावाने स्वतःसाठी ठेऊन घेईल. प्रश्न मिटला!

शासनाचा एक पैसाही न गुंतवता, एकही सरकारी नोकर नव्याने न नेमता, सरकारी खजिन्यात 5 रूपयांची भर पडेल! एका सुशिक्षित बेरोजगाराला स्वयंरोजगार मिळेल. तोही एक पैशाचीही सरकारी गुंतवणूक न करता! काय हरकत आहे हा प्रयोग करून पहायला?

आणि हे केवळ रस्त्यावर घाण करणे इतपतच सीमीत न ठेवता, राँग पार्कींग, हातगाडीवाल्यांचे वा फेरीवाल्यांचे फूटपाथवरचे आक्रमण, बसस्टॉपवर रांग मोडणे, लाऊड-स्पीकर कर्कशपणे लावणे, वहानांना चित्रविचित्र आवाजाचे हॉर्न बसविणे, रिक्शातून जादा प्रवाशांची ने-आण करणे, अशा अनेक किरकोळ स्वरूपाच्या नियमभंगाबद्दल करता येईल. या सर्वच गोष्टीचे नियंत्रण केवळ पोलिसांकडून होणे, हे पोलीसांची मर्यादीत संख्या लक्षात घेता अशक्यच आहे. मग असा नवा मार्ग हाताळायला काय हरकत आहे? सिंगापूरमध्ये कोणी रस्त्यावर थुंकले वा बसचे तिकिट जरी टाकले तरी पोलीस येऊन जागच्या जागी दंड करतो म्हणे! पोलीसांचे हे काम येथे मान्यताप्राप्त खाजगी निरिक्षकांनी करावे एवढेच!.

खरे तर माझ्या कल्पनेत काहींच नवीन नाही. जागच्या जागी दंड ही कल्पना हल्ली देखील आपण मर्यादीत प्रमाणात आणि वेगळ्या संदर्भात राबवितच आहोत. तुम्ही विना परवाना (without license) गाडी चालविता आहात, चौकातीत वाहतुक पोलीस तुम्हाला अडवितो. परवाना पहायला मागतो. तुमच्याकडे त्याक्षणी परवाना नसला तर तो तुम्हाला 150 रूपये दंड सांगतो. तुमच्याकडून दंड घेतो. जागच्या जागी पावती देतो. प्रश्न मिटला. हां, अनेकदा तोड(!) म्हणून तुम्ही 50 रूपये देता (अर्थात गुपचूप) तोही तुम्हाला तसेच सोडून देतो. (अर्थातच गुपचूप!) अशा वेळी नव्या व्यवस्थेत काय काय करायचे ते पण नंतर पाहू. पण मुळात म्हणजे जागच्या जागी दंड वसूल करण्याची पध्दत व यंत्रणा दोन्हीही आजही उपलब्ध आहेच. फक्त सरकारी पातळीवर आहेत; खासगीरित्या नव्हे, एवढेच!         

मग हाच व्यवहार बिगरपोलीस पण गणवेशधारी अधिकृत यंत्रणेकडून पार पाडायला अडचण कसली आहे?

तुम्ही गाडी चुकीच्या जागी लावता, पोलीसांची क्रेन येते, तुमची गाडी उचलून नेते, तुम्ही रिक्शा करून त्या गाडीमागोमाग जाता, पोलीस सांगतील तो 200/250 दंड भरता. तो पावती देतो. तुमची गाडी ताब्यात देतो. बरोबर? नियमभंग तुमच्याकडून झाला असेल तर दंड भरण्याऐवजी अन्य उपायच नाही. हीच गाडी पोलीसांऐवजी कायदेशीर अधिकार असलेल्या अन्य कोणी व्यक्तीने नेली तर काय हरकत आहे? ती पोलीस-यंत्रणाच असायला हवी, सरकारी-यंत्रणाच असायची हवी अशी गरजच काय? ती यंत्रणा सरकारमान्य असली, अधिकृत असली आणि नियमाबरहुकुम चालणारी असली की बस्स झाले!

नाही तरी हल्ली जकात वसुलीचे काम अनेक महानगरपालीका ठेक्यावर देतातच की! ठेकेदाराला जकात वसुलीचा कायदेशीर अधिकार आहे म्हणून त्यांच्या नोकरांच्या अंगावर गणवेश नसला तरी तुम्ही जकात भरता. तुम्ही समजा जकात चुकवायचा प्रयत्न केलात, आणि त्याच्या माणसांकडून पकडले गेलात तर तुमच्याकडून दंड म्हणून जादाची रक्कमही भरता. गेली कित्येक वर्षे रस्ताबांधणीचे काम स्वतः करण्याऐवजी शासन ते BOT पध्दतीने देते आणि मग आपण त्या खासगी ठेकेदाराला टोलचे पैसे निर्धारित दराने देतो आहोतच की! टोलनाक्यावरचे कर्मचारी पोलिस वा शासकीय नोकर थोडेच आहेत?

जर खाजगी STD बूथ हे टेलीफोन खात्याच्या सरकारी कामाला समांतर काम करू शकतात, जर खासगी कुरीयर सर्व्हीसेस पोस्टखात्याला समांतर काम करू शकतात, जर काही नगरपालिका त्यांचे जकात वसुलीचे, कचरा उचलण्याचे, घरपट्टी, पाणीपट्टी, आठवडाबाजारची बाजारपट्टी वसुलीचे काम ठेक्यावर देऊन, एकप्रकारे इतर नगरपालिकांपुरती एक समांतर खासगी व्यवस्थाच जर नर्माण करतात; आणि ती व्यवस्था बिनबोभाट चालते, शासनमान्य असते, कायदेशीर ठरते, तर खासगी स्वच्छता निरिक्षक ही संकल्पना का रूजणार नाही?

मला ठाऊक आहे, तुमच्या मनात नेमके काय खुटखुटते आहे ते!

एखादा माणूस थुंकला नसता, पैशाच्या लोभाने निरिक्षकाने त्याच्यावर खोटा आळ घेतला तर? किंवा दंड भरायला कबूल न होता, ‘मी थुंकलोच नाहीअसा खोटा पवित्रा कुणी घेतला तर?

खरे म्हणजे अगदीच वादाचा असा प्रसंग आला तर थुंकीची प्रयोगशाळेत तपासणी करता येते एवढे सत्य दोघांनाही आधीच ठाऊक करून द्यावे. थुंकला असून तो खोटा बोलल्याचे सिध्द झाले तर थुंकी तपासणीचा खर्च, सरकारी नोकराचा वेळ वाया घालविणे, खोटे बोलणे अशा गुन्ह्यांबद्दल व खर्चाबद्दल त्याला 500 रूपये पर्यंत जबर दंड होऊ शकेल याची आधीच कल्पना द्यावी. थुंकी तपासता येते आणि त्यावरून कोण थुंकला हे सिध्द करता येते आणि खोटे बोललो तर इतका जबर दंड होऊ शकतो हे कळले तर, जर तो खरेच थुंकला असेल तर तो कबूल करून 10 रूपये दंड भरून मोकळा होईल!

जर या उलट, ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी फोले उचलणार नाहीया जातीचा बहाद्दर असला आणि खरेच थुंकला नसला तर तो थुंकी तपासणी करवून घेण्यास राजी होईल. अशा वेळी तो खरा ठरला तर अधिकाराचा गैरवापर करून सज्जन नागरिकास त्रास दिल्याबद्दल निरिक्षकास 500 रूपये दंड होऊ शकेल व असा 2 ते 3 वेळा दंड झाला तर नेमणूक कायमसाठी रद्द होईल; अशी निरिक्षकास आधीच कल्पना दिली तर 5 रूपयांच्या मोहापाई तो सोन्याचे अंडे देणारी ही नेमणूक नावाची कोंबडी कापून खाणार नाही. त्यामुळे याप्रकारे वादविवाद फारसे होणार नाहीत आणि समजा झाले तर ते कसे सोडवायचे ते त्यावेळी पाहू. उगाच आपले पुढे कधी तरी भांडण होऊन घटस्फोटाची वेळ येईल या भितीने लग्नच न करण्यात काय शहाणपण आहे?

दुसरी भिती आहे की निरिक्षकाने पावती फाडण्याऐवजी तोडकरून तर स्वतःचाच खिसा भरायला सुरवात केली तर?

तर तसे बेशक करू दे!

एक तर त्याला काम देतानाच, धंदा होवो न होवो रिक्शाचालक जसे रिक्शा मालकाला किमान भाडे देण्यास बांधील असतो तसे याने काही ठराविक रक्कम दररोज सरकारकडे भरलीच पाहिजे एवढे त्याच्यावर बंधन घालू. यामुळे सरकारला किमान रक्कम तर नक्कीच मिळेल, आणि तोडीचा मामला सुध्दा फार काळ चालणार नाही. अहो, दिवसातून चार-चार वेळा तोडम्हणून अ्रगदी एकेक दो-दोन रुपये द्यायची वेळ येणार असेल तर माणसे रस्त्यावर थुंकणेच काय पण पान खाणे सुध्दा सोडून देतील. आता तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतोच; त्याच्या साहाय्याने सहजपणे फोटो काढून तो पुरावा म्हणून सादर करता येतो, फोटोवर दिनांक, वेळ, स्थळ याची ऑटोमॅटिक नोंद होते हे सर्वांनाच ठाऊक आहे. प्रत्येक निरिक्षकाच्या हातात जर आपण स्मार्टफोन दिला तर मग याच तंत्रामुळे विना परवाना गाडी चालविणे, प्रदूषणमुक्त गाडीचा दाखला न बाळगणे, विमा न उतरविणे, डबल सीट, टेल लॅम्प- ब्रेक लॅम्प- इंडीकेटर लाईट नसताना गाडी चालविणे, नो एंट्रीतून जाणे, गाडीला कर्कश भोंगा बसविणे, सायलेन्सर काढलेली, नंबरप्लेट नसलेली गाडी चालविणे वगैरे गोष्टी तर हा सूर्य हा जयद्रथ न्यायानेठरणार असल्याने, प्रत्येक चौकात तोडकरत जाण्यापेक्षा माणसे नियमाचे पालन करणे पसंत करतील.

पहा बुवा मला तर वाटते, तुम्ही अडचण सांगा मी त्यावर लगेच चालू सिस्टिममधला समांतर तेाडगा सांगतो. पाहू या कोण हारते ते! तुम्हीच हाराल यावर  पैज आपली!

रवीन्द्र देसाई

९८५०९५५६८०

desaisays@gmail.com

Tuesday, August 19, 2014

निमित्य आहे ......



निमित्य आहे मोहसिन शेखच्या निघृण हत्त्येचे!

राज्य कोणा एका व्यक्तीचे वा पक्षाचे नसावे; तर राज्य कायद्याचे असावे, असे आपणा सर्वांना खरोखरच वाटते का? शासन कोणा एका व्यक्तीच्या मर्जीनुसार अथवा कोणत्याही धर्मगुरुच्या फतव्यानुसार चालू नये तर ते राज्यघटनेची बांधिलकी मानून चालावे, हे आपणा सर्वांना तत्त्वतः तरी मान्य आहे का? स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव ही खरोखरच आपली जीवनमूल्ये असावीत असे आपणा सर्वांना वाटते का?
दुर्देवाने या देशातील अनेकांना ते तसे तितक्याशा पोटतिडकीने वाटतच नाही; उलट नेमक्या याच बाबी त्यांना जाचक वाटतात, किंवा स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव या संकल्पनांची त्यांची व्याख्या तरी सर्वसामान्य व्याख्येपेक्षा निराळी आहे, हीच आपली खरी अडचण आहे. कायद्याचे राज्यही संकल्पनाच आपल्यापैकी अनेकांना उमगत नाही आणि बळेबळे (म्हणजे बळाचा वापर करून नव्हे हं! आपण दगडावर डोके आपटून घेण्याचा निरर्थ प्रयत्न या अर्थाने) त्यांच्या घशाखाली ते उतरवायचा कोणी प्रयत्न केला तरी ती त्यांच्या पचनी पडत नाही. देशात सांप्रदायिक संघर्ष पेटण्याचे हेही एक प्रमुख कारण आहे. मी येथे अनेकांच्याहा शब्द काळजीपूर्वक वापरलेला आहे. बहुसंख्यकांच्या वा अल्पसंख्यकांच्या ते पचनी पडत नाही असे म्हणून मी त्यातील कोणाही एका गटाची नालस्ती वा भलावण करू इच्छित नाही. याचे कारण बहुसंख्यकांमध्येही अल्पमतातील विरोधक असतात आणि अल्पसंख्यकांमध्येही बहुसंख्यांचे मत मनोमनी त्यांच्या तथाकथित नेत्यांच्या विरोधी असू शकते. पण एक गोष्ट मात्र तितकीच खरी की हिंदू-मुसलमानांत वादंग उमटले रे उमटले की आम्ही हिंदू असो वा मुसलमान, आम्हाला लगेच केवळ आपापला धर्म आणि आपापल्या धार्मिक हितसंबंधांचीच आठवण येते. अशा वेळी आम्हापैकी बहुतेक कोणालाच मग न्यायनको असतो; आम्हा सर्वांनाच आपल्या बाजूने केवळ निकालहवा असतो.
याच वृत्तीमुळे आपणापैकी बहुतेकांना कोणत्याही घटनेचा वा गुन्ह्याचा वस्तुनिष्ठपणे आणि स्वतंत्र्यपणे विचार करणे अवघड जाते, एकाने गाय मारली (गोमाता नव्हे! म्हणी आणि वाक्प्रचारातील साधीसुधी निरुपद्रवी गाय!) म्हणून दुसऱ्याने वासरू मारणेही आपण क्षम्य मानू पाहतो - आपण म्हणजे अल्पसंख्य आणि बहुसंख्य दोघेही! किंवा गाय मारणाऱ्याला (पुन्हा तीच ती साधीसुधी म्हणी आणि वाक्प्रचारातील निरुपद्रवी गाय! गोमाता नव्हे!) शिक्षा झाली नाही म्हणून वासरू मारणाऱ्यालाही शिक्षा होऊ नये असा आग्रह याच वृत्तीतून धरला जातो. आपल्या अशिलाने गुन्हा केला आहे हे ठाऊक असूनही त्याच्या बचावासाठी त्याचा वकिल जसा धादांत खोटा युक्तीवाद करत असतो, तसेच दोन्ही बाजूंचे बोलणे असते. मात्र बहुतेक वेळी त्यात साक्षीपुराव्याचा उहापोह होण्याऐवजी, चोरी करताना रंगेहाथ पकडलेल्या एखाद्या चोराने, ‘यापूर्वी आजवर झालेल्या सर्व गुन्हेगारांना आधी शिक्षा व्हावी आणि मगच माझ्यावर खटला भरावाअशी मागणी करण्यासारखीच बालीश आणि हास्यास्पद विधाने त्या अभिनिवेशात दोन्ही बाजूंकडून केली जातात.
प्रत्येक गुन्हा वेगळा असतो, त्याचा तपास करणारे अधिकारी वेगवेगळे असतात, त्यांचा अनुभव, अभ्यास, समज, तपासकौशल्याची पातळी वेगवेगळी असते, तपासासाठी मिळणारी साधनसामग्री व सवड कमी-जास्त असते आणि त्याच बरोबरीने त्यांची कामावरील निष्ठा, वरिष्ठांचा दबाब झुगारण्याची वा आर्थिक प्रलोभनाला बळी न पडण्याची त्यांची क्षमता आणि इमानदारीही कमी-जास्त पातळीची असते. शिवाय अशास्त्रीयरित्या जमवलेला पुरावा, एैनवेळी उलटणारे बिनभरंवशाचे साक्षीदार आणि बहुसंख्य वेळा खासगी प्रॅक्टिस जमत नाही म्हणून सरकारी वकिलाची नोकरी पत्करलेले दुय्यम दर्जाचे वकील या साऱ्याची गोळाबेरीज केली तर जातीय दंग्यातील बहुतेक खटल्यामधील आरोपी निर्दोष सुटतात, यात फारसे नवल नाही. सर्वसामान्य लोकांपैकी बहुतेकांना न्यायालयाची प्रक्रिया कशी चालते याचे काडीचेही ज्ञान नसते. तीन तासाच्या हिंदी सिनेमात जेमतेम पाच मिनिटे दाखवलेले कोर्ट हीच त्यांची अनुभवाची एकमेव पोतडी! त्यामुळे आपल्या अपेक्षेनुसार निकाल लागला नाही की बहुसंख्यांकांच्या दबावापुढे न्यायालय झुकल्याची अल्पसंख्याकांची खात्रीच पटते; या उलट अल्पसंख्याकांच्या बाजूने निकाल लागला की शासनासारखीच न्याययंत्रणाही आता अल्पसंख्यांकांच्या अनुनयाची कास धरु लागली आहेत अशी पिंक टाकायला बहुसंख्यांकांच्या जहाल मतवादी संघटना तयारच असतात. यातूनच मग दोन्ही बाजूच्या कट्टरपंथीयांना बळ मिळते.


पण हे कोणीच कोणाच्या नजरेस आणून देत नाही की कोणत्याही न्यायालयातला आजवरचा कोणताही खटला हिंदू धर्म विरुध्द मुसलमान धर्म असा लढवला गेलेला नाही, असा लढवला जाण्याची शक्यताही नाही. अशा साऱ्या खटल्यांचे स्वरुप हे प्रचलित कायद्याचे एखादे वा अनेक कलमे तोडणारी व्यक्ती, संघटना वा जमाव यांच्या विरूध्द राज्य सरकार वा केन्द्र सरकार असे असते. त्याचा निकाल साक्षपुराव्याच्या जोरावर आणि कायद्याच्या कलमांनुसार होतो. त्यामुळे मुळातच अशा कोणत्याही खटल्याला जातीय रंग देण्याचे काही कारणच नाही किंवा कोणत्याही  खटल्यात आपापल्या धर्माच्या गुन्हेगाराला शिक्षा झाली तर तो आपल्या धर्माचा पराभव मानण्याचे काही कारण नाही. निकाल कसाही लागला तरी तो त्या दोन पक्षकारांपुरता जय-विजय असतो. अशा एखाद्या खटल्यातील हिंदू वा मुसलमान आरोपी (आरोपी कसले खरे खुरे गुन्हेगारच!) भले जरी तांत्रिक मुद्यांवर निर्दोष सुटले तरी त्याने त्यांच्या त्यांच्या धर्माचे तेजोवलय अधिक उजळत नाही; उलट ते झाकोळलेच जाते. हे आपण सारे स्पष्टपणे कधी बोलणार?
स्थैर्य असेल तरच विकास होतो. आणि र्स्थर्य केवळ न्याय, समता आणि बंधूभावातून येऊ शकते. स्वातंत्र्य असेल तरच नवनवोन्मेष होऊ शकतो. त्यामुळे देशाला पुढे घेऊन जायची इच्छा असेल तर आपणा सर्वांना केवळ स्वातंत्र्य, समता, बंधूभाव, कायद्याचे राज्य आणि न्यायाचाच आग्रह धरायला हवा! न्याय याचाच अर्थ निःपक्षपाती निर्णय! भय व लोभ या विकारांपलिकडे जाऊन, सद्सद्विवेक बुध्दीला स्मरून केवळ साक्षी-पुराव्यावर विसंबून प्रचलित कायद्यानुसार केलेला निवाडा! आम्हा सर्वांना त्याची आंस कधी लागणार?

कोर्टात न्याय मिळतोच असे नाही; कोर्टात जे मिळते त्याला न्याय म्हणावे लागते, कोणी तरी वैतागून म्हटलेले हे वाक्य अनेकदा खरेही ठरत असेल; कारण न्यायप्रक्रियेतही काही त्रुटी आहेत आणि न्यायसंस्थेच्याही काही मर्यादा आहेत. प्रचलित पघ्दतीत प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा होईलच असे नाही. गुन्हा करूनही गुन्हेगार राजरोस सुटून जाऊ शकेल. पण याचा अर्थ आपल्या लेखी जो कोणी गुन्हेगार असेल त्याला आपण स्वतः कायदा हातात घेऊन शिक्षा फर्मावायची नसते. तसे करणे नुसतेच बेकायदेशीर नव्हे तर रोगापेक्षा औषध भयंकर असेच ठरेल. आँख के बदले आँख असे सूडसत्र चालू राहिले तर सारी मानवजातच आंधळी होऊन जाईल, हे लक्षात घ्यायला नको का?