Tuesday, October 7, 2014


स्वच्छता अभियान झिंदाबाद!

आर्याचे मूळ वसतीस्थान कोणते इथपासून ते हा देश नेमका कोणाचा आहे इथपर्यंत अनेक मतमतांतरे आहेत. या बाबत जहाल राजकीय मत-प्रणाली हिरिरीने मांडल्या गेल्या आहेत. पण तसला कोणताही सिध्दांतमांडणारे राज्यशास्त्राचे वा समाजशास्त्राचे हे सारे तथाकथित विव्दान एकजात चूक आहेत, असा माझा स्वतःचा लाडकासिध्दांत आहे. कोणताही देश हा त्यातल्या बहुसंख्याकांचा असतो हा दावा खरा मानला तर हा देश आहे कोणीही, कुठेही बिनदिक्कत थुंकणाऱ्याचा! हा देश आहे घरातला कचरा बेमालूमपणे (वा राजरोससुध्दा) रस्त्यावर ढकलून देणाऱ्यांचा! हा देश आहे रस्त्यावरच नाईलाजपणे (वा निष्काळजीपणे!) देहधर्म उरकणाऱ्यांचा! हा देश आहे रस्त्यावर मोफाट जनावरे सोडणाऱ्यांचा आणि सार्वजनिक जागांवर निर्ल्लजपणे आक्रमण करणाऱ्यांचा! थोडक्यात म्हणजे हा देश आहे सारे नागरीकशास्त्र गुंडाळून ठेऊन, सार्वजनिक स्वच्छतेची व सार्वजनिक संपत्तीची एैसी की तैसीकरणाऱ्यांचा!

आणि अशा या अव्दितीयजनतेनेच निवडून दिलेल्या शासनाला आता सार्वजनिक स्वच्छता अभियानचालवायचे आहे!

अशा वेळी मला शासनाबद्दल खरोखरच सहानुभूती वाटते. सहानुभूती हा शब्दसुध्दा येथे फारच थिटा आहे. मला सरकारची करूणा येते, कीव येते, माझ्या पोटात तुटते. मंडळी, तुम्हीच विचार करा की ही लढाई किती एकतर्फी आहे? त्या बापड्या अर्जुनाची अडचण एवढीच होती की त्याला केवळ आप्त-स्वकीयांशी लढावे लागणार होते. पण कौरवांच्या त्या अकरा औक्षणी (चूकभूल देणे घेणे) सैन्याला तोंड देण्यासाठी याच्याकडे निदान सात औक्षणी (पुन्हा एकदा चूक भूल देणे घेणे!) सैन्य तरी होतेच होते. म्हणजे त्याच्या हाती निदान तुटपुंजी कां होईना पण साधनसामग्री मौजूद होती आणि साऱ्या पापांची जबाबदारी घ्यायला पाठीशी खुद्द कृष्णपरमात्मा सिध्द होता. इथे एकल्या शासनाला हे युध्द केवळ आप्त-स्वकियांशीच नव्हे तर चक्क भावी मतदारांशीही लढायचे आहे. शिवाय हतो वा प्राप्यसी स्वर्गम्ची गॅरंटीदेणारे कोणी पाठीशी नाही ते नाहीच. कुरूक्षेत्र कितीही विस्तीर्ण होते म्हंटले तरी त्याच्या सीमा नजरेच्या टप्प्यात येत होत्या. इथे सारा खंडप्राय देशच या अभियानासाठी एक मोठे रणांगण आहे. शत्रू(?)सैन्य आहे सुमारे एक अब्ज! जे काय 5-10 कोटी कमी असतील ते काही दिवसातच भरून काढायचे अचाट कर्तृत्व जनतेच्या अंगी आहेच; आणि ज्या दुर्गुणांविरूध्द शासकीय कर्मचारी नावाच्या ज्या सैन्याच्या जोरावर ही लढाई लढायची, ते सारे सैन्य स्वतःच त्या साऱ्या दुर्गुणांनी लिप्त आहे, म्हणजे फार कडक कारवाई करायचे ठरवले तर प्रथम स्वतःच्याच अनेक सैनिकांना कंठस्थान घालावे लागणार अशी दशा!

देशाचा अफाट विस्तार आणि जनतेच्या हाडीमासी खिळलेल्या असंख्य घाणेरड्या सवंयी लक्षात घेतल्या तर केवळ कागदावर कायदे पास करून अथवा केवळ शासकिय कर्मचाऱ्यांच्या जीवावर हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविता येणार नाही. हां, एका दिवसासाठी, आठवड्यासाठी, पंधरवड्यासाठी, महोत्सवी स्वरूपात असे अभियान चालविता येईलही! पण तेवढ्यापुरतेच! कायमस्वरूपी हे स्वच्छता अभियान चालवायचे असेल तर त्यासाठी काहींतरी संपूर्णतः वेगळीच रचना करावी लागेल.

आणि अशी कोणतीही रचना करताना सर्वात पहिली अट असेल ती म्हणजे यासाठी शासनाच्या तिजोरीवर जादाचा भार पडता कामा नये. हंगामी वा कायम स्वरूपाची जादाची नोकरभरती त्याकरता अपेक्षित असता कामा नये. उपलब्ध मानवीबळात आणि उपलब्ध साधनसामग्रीतच योग्य तो परीणाम साधता आला पाहिजे. फार वर्षापूर्वी वऱ्हाडी माणंसनावाचे नाटक मी वाचले होते. त्यातल्या नाटकातील त्या वृध्द नोकराच्या, दाजीबाच्या भाषेत सांगायचे तर, ‘पदरातून इस्तू नेताना, पदर तर प्येटला नाई पायजे, इस्तू तर विझला नाई पाहिजे, आणि कुळवंतीची चाल त्या धगीने बिगडलीबी नाई पाहिजे.

तुम्हाला सुचतो असा कांही उपाय? उपलब्ध यंत्रणेवर जादा कामाचा बोजा न टाकणारा? तिजोरीवर जादा भर न टाकणारा? आणि तरीही इफेटिव्ह’!

मला सुचतो.

आपण स्वच्छता-निरिक्षकनावाची संपूर्ण नवी यंत्रणा उभारूया. पूर्णतः स्वतंत्र म्हणजे उपलब्ध सरकारी, निम-सरकारी नोकरांवरही जादा कामाचा भार नको अथवा सरकारी तिजोरीवरही जादाचा बोजा पडायला नको.

All great ideas are basically very simple या न्यायाने माझी ही कल्पनाही अगदी साधी सोपी आहे; माझ्या इतर कल्पना असतात तशीच! आणि शिवाय खासगीकरणाच्या या जमान्यात ती कालसुसंगतही आहे. आणि शिवाय सुशिक्षित बेकारांनाही त्यातून स्वयंरोजगार मिळेल.

सुशिक्षित बेकारांनी फक्त एवढेच करायचे की शासनाने ठरवून दिलेल्या पध्दतीचा गणवेश त्यांनी स्वखर्चाने शिवून घ्यायचा. स्वखर्चाने हं, म्हणजे शासनाला गणवेशाचा देखील खर्च नाही. अशा सर्व गणवेशधारकांना शासनाने एक ओळखपत्र आणि नेमणूकपत्र द्यायचे. कामाचे स्वरूप आणि कार्यकक्षा ठरवून द्यायची. शासकिय सहीशिक्याचे एक पावतीपुस्तक त्यांच्या हाती द्यायचे. बस्स, एवढाच काय तो शासनाचा खर्च! फारतर या स्टेशनरीचे पैसे सुध्दा शासनाने यांच्याकडूनच वसूल करावेत. आणि हो, नियमभंगाबाबत आकारण्याच्या दंडाच्या अधिकृत दरपत्रकाची एक प्रत मात्र शासनाने त्यांना पुरवायची. वर्तमानपत्रे, टीव्ही आणि वेबपेजसारख्या माध्यमातून त्या दरपत्रकाला सतत प्रसिध्दीही द्यायची.

म्हणजे पहा हं, कार्यकक्षा म्हणजे नेमक्या कोणत्या हद्दीत त्या त्या निरिक्षकाचा अधिकार चालेल हे स्पष्ट असेल. कामाचे स्वरूप म्हणजे त्याने नेमक्या कोणत्या नियमभंगाबद्दल कारवाई करायची हे स्पष्ट असेल. त्यापलीकडे कोणत्याही बाबतीत त्याचा अधिकार चालणार नाही. त्या प्रत्येकाच्या अंगावर गणवेश, ओळखपत्र, नेमणूकपत्र आणि अधिकारपत्र असे सारेच असल्याने कोणी तोतयेगिरीही करू शकणार नाही अथवा कोणी त्याच्या अधिकाराला आव्हान देण्याच्या भानगडीत पडणार नाही. नियमभंग करताना त्याने कोणाला पकडले तर छापील दरपत्रकाप्रमाणे दंड वसूल करून सरकारी पावती देण्याची त्याच्यावर जबाबदारी असेल.

म्हणजे आता काय होईल पहा हं. रस्त्यावर कोणी माणूस थुंकताना, केर टाकताना, अथवा अन्य मार्गाने घाण करताना आढळला तर त्या व्यक्तीला हा निरिक्षक जागच्या जागी दंड करेल. पावती देईल. समजा, रस्त्यावर थुंकण्याचा दंड म्हणून 10 रूपये जमा झाले तर हा निरिक्षक संध्याकाळी त्यातले पाच रूपये सरकारी तिजोरीत भरेल 5 रूपये कोणी इश म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी सत्यनारायण म्हणतात या धर्तीवर, स्वतःचे कमिशनम्हणा, ‘पगारम्हणा, ‘मेहनतानाम्हणा, ‘कमाईम्हणा, ‘भरपाईम्हणा, या नावाने स्वतःसाठी ठेऊन घेईल. प्रश्न मिटला!

शासनाचा एक पैसाही न गुंतवता, एकही सरकारी नोकर नव्याने न नेमता, सरकारी खजिन्यात 5 रूपयांची भर पडेल! एका सुशिक्षित बेरोजगाराला स्वयंरोजगार मिळेल. तोही एक पैशाचीही सरकारी गुंतवणूक न करता! काय हरकत आहे हा प्रयोग करून पहायला?

आणि हे केवळ रस्त्यावर घाण करणे इतपतच सीमीत न ठेवता, राँग पार्कींग, हातगाडीवाल्यांचे वा फेरीवाल्यांचे फूटपाथवरचे आक्रमण, बसस्टॉपवर रांग मोडणे, लाऊड-स्पीकर कर्कशपणे लावणे, वहानांना चित्रविचित्र आवाजाचे हॉर्न बसविणे, रिक्शातून जादा प्रवाशांची ने-आण करणे, अशा अनेक किरकोळ स्वरूपाच्या नियमभंगाबद्दल करता येईल. या सर्वच गोष्टीचे नियंत्रण केवळ पोलिसांकडून होणे, हे पोलीसांची मर्यादीत संख्या लक्षात घेता अशक्यच आहे. मग असा नवा मार्ग हाताळायला काय हरकत आहे? सिंगापूरमध्ये कोणी रस्त्यावर थुंकले वा बसचे तिकिट जरी टाकले तरी पोलीस येऊन जागच्या जागी दंड करतो म्हणे! पोलीसांचे हे काम येथे मान्यताप्राप्त खाजगी निरिक्षकांनी करावे एवढेच!.

खरे तर माझ्या कल्पनेत काहींच नवीन नाही. जागच्या जागी दंड ही कल्पना हल्ली देखील आपण मर्यादीत प्रमाणात आणि वेगळ्या संदर्भात राबवितच आहोत. तुम्ही विना परवाना (without license) गाडी चालविता आहात, चौकातीत वाहतुक पोलीस तुम्हाला अडवितो. परवाना पहायला मागतो. तुमच्याकडे त्याक्षणी परवाना नसला तर तो तुम्हाला 150 रूपये दंड सांगतो. तुमच्याकडून दंड घेतो. जागच्या जागी पावती देतो. प्रश्न मिटला. हां, अनेकदा तोड(!) म्हणून तुम्ही 50 रूपये देता (अर्थात गुपचूप) तोही तुम्हाला तसेच सोडून देतो. (अर्थातच गुपचूप!) अशा वेळी नव्या व्यवस्थेत काय काय करायचे ते पण नंतर पाहू. पण मुळात म्हणजे जागच्या जागी दंड वसूल करण्याची पध्दत व यंत्रणा दोन्हीही आजही उपलब्ध आहेच. फक्त सरकारी पातळीवर आहेत; खासगीरित्या नव्हे, एवढेच!         

मग हाच व्यवहार बिगरपोलीस पण गणवेशधारी अधिकृत यंत्रणेकडून पार पाडायला अडचण कसली आहे?

तुम्ही गाडी चुकीच्या जागी लावता, पोलीसांची क्रेन येते, तुमची गाडी उचलून नेते, तुम्ही रिक्शा करून त्या गाडीमागोमाग जाता, पोलीस सांगतील तो 200/250 दंड भरता. तो पावती देतो. तुमची गाडी ताब्यात देतो. बरोबर? नियमभंग तुमच्याकडून झाला असेल तर दंड भरण्याऐवजी अन्य उपायच नाही. हीच गाडी पोलीसांऐवजी कायदेशीर अधिकार असलेल्या अन्य कोणी व्यक्तीने नेली तर काय हरकत आहे? ती पोलीस-यंत्रणाच असायला हवी, सरकारी-यंत्रणाच असायची हवी अशी गरजच काय? ती यंत्रणा सरकारमान्य असली, अधिकृत असली आणि नियमाबरहुकुम चालणारी असली की बस्स झाले!

नाही तरी हल्ली जकात वसुलीचे काम अनेक महानगरपालीका ठेक्यावर देतातच की! ठेकेदाराला जकात वसुलीचा कायदेशीर अधिकार आहे म्हणून त्यांच्या नोकरांच्या अंगावर गणवेश नसला तरी तुम्ही जकात भरता. तुम्ही समजा जकात चुकवायचा प्रयत्न केलात, आणि त्याच्या माणसांकडून पकडले गेलात तर तुमच्याकडून दंड म्हणून जादाची रक्कमही भरता. गेली कित्येक वर्षे रस्ताबांधणीचे काम स्वतः करण्याऐवजी शासन ते BOT पध्दतीने देते आणि मग आपण त्या खासगी ठेकेदाराला टोलचे पैसे निर्धारित दराने देतो आहोतच की! टोलनाक्यावरचे कर्मचारी पोलिस वा शासकीय नोकर थोडेच आहेत?

जर खाजगी STD बूथ हे टेलीफोन खात्याच्या सरकारी कामाला समांतर काम करू शकतात, जर खासगी कुरीयर सर्व्हीसेस पोस्टखात्याला समांतर काम करू शकतात, जर काही नगरपालिका त्यांचे जकात वसुलीचे, कचरा उचलण्याचे, घरपट्टी, पाणीपट्टी, आठवडाबाजारची बाजारपट्टी वसुलीचे काम ठेक्यावर देऊन, एकप्रकारे इतर नगरपालिकांपुरती एक समांतर खासगी व्यवस्थाच जर नर्माण करतात; आणि ती व्यवस्था बिनबोभाट चालते, शासनमान्य असते, कायदेशीर ठरते, तर खासगी स्वच्छता निरिक्षक ही संकल्पना का रूजणार नाही?

मला ठाऊक आहे, तुमच्या मनात नेमके काय खुटखुटते आहे ते!

एखादा माणूस थुंकला नसता, पैशाच्या लोभाने निरिक्षकाने त्याच्यावर खोटा आळ घेतला तर? किंवा दंड भरायला कबूल न होता, ‘मी थुंकलोच नाहीअसा खोटा पवित्रा कुणी घेतला तर?

खरे म्हणजे अगदीच वादाचा असा प्रसंग आला तर थुंकीची प्रयोगशाळेत तपासणी करता येते एवढे सत्य दोघांनाही आधीच ठाऊक करून द्यावे. थुंकला असून तो खोटा बोलल्याचे सिध्द झाले तर थुंकी तपासणीचा खर्च, सरकारी नोकराचा वेळ वाया घालविणे, खोटे बोलणे अशा गुन्ह्यांबद्दल व खर्चाबद्दल त्याला 500 रूपये पर्यंत जबर दंड होऊ शकेल याची आधीच कल्पना द्यावी. थुंकी तपासता येते आणि त्यावरून कोण थुंकला हे सिध्द करता येते आणि खोटे बोललो तर इतका जबर दंड होऊ शकतो हे कळले तर, जर तो खरेच थुंकला असेल तर तो कबूल करून 10 रूपये दंड भरून मोकळा होईल!

जर या उलट, ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी फोले उचलणार नाहीया जातीचा बहाद्दर असला आणि खरेच थुंकला नसला तर तो थुंकी तपासणी करवून घेण्यास राजी होईल. अशा वेळी तो खरा ठरला तर अधिकाराचा गैरवापर करून सज्जन नागरिकास त्रास दिल्याबद्दल निरिक्षकास 500 रूपये दंड होऊ शकेल व असा 2 ते 3 वेळा दंड झाला तर नेमणूक कायमसाठी रद्द होईल; अशी निरिक्षकास आधीच कल्पना दिली तर 5 रूपयांच्या मोहापाई तो सोन्याचे अंडे देणारी ही नेमणूक नावाची कोंबडी कापून खाणार नाही. त्यामुळे याप्रकारे वादविवाद फारसे होणार नाहीत आणि समजा झाले तर ते कसे सोडवायचे ते त्यावेळी पाहू. उगाच आपले पुढे कधी तरी भांडण होऊन घटस्फोटाची वेळ येईल या भितीने लग्नच न करण्यात काय शहाणपण आहे?

दुसरी भिती आहे की निरिक्षकाने पावती फाडण्याऐवजी तोडकरून तर स्वतःचाच खिसा भरायला सुरवात केली तर?

तर तसे बेशक करू दे!

एक तर त्याला काम देतानाच, धंदा होवो न होवो रिक्शाचालक जसे रिक्शा मालकाला किमान भाडे देण्यास बांधील असतो तसे याने काही ठराविक रक्कम दररोज सरकारकडे भरलीच पाहिजे एवढे त्याच्यावर बंधन घालू. यामुळे सरकारला किमान रक्कम तर नक्कीच मिळेल, आणि तोडीचा मामला सुध्दा फार काळ चालणार नाही. अहो, दिवसातून चार-चार वेळा तोडम्हणून अ्रगदी एकेक दो-दोन रुपये द्यायची वेळ येणार असेल तर माणसे रस्त्यावर थुंकणेच काय पण पान खाणे सुध्दा सोडून देतील. आता तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतोच; त्याच्या साहाय्याने सहजपणे फोटो काढून तो पुरावा म्हणून सादर करता येतो, फोटोवर दिनांक, वेळ, स्थळ याची ऑटोमॅटिक नोंद होते हे सर्वांनाच ठाऊक आहे. प्रत्येक निरिक्षकाच्या हातात जर आपण स्मार्टफोन दिला तर मग याच तंत्रामुळे विना परवाना गाडी चालविणे, प्रदूषणमुक्त गाडीचा दाखला न बाळगणे, विमा न उतरविणे, डबल सीट, टेल लॅम्प- ब्रेक लॅम्प- इंडीकेटर लाईट नसताना गाडी चालविणे, नो एंट्रीतून जाणे, गाडीला कर्कश भोंगा बसविणे, सायलेन्सर काढलेली, नंबरप्लेट नसलेली गाडी चालविणे वगैरे गोष्टी तर हा सूर्य हा जयद्रथ न्यायानेठरणार असल्याने, प्रत्येक चौकात तोडकरत जाण्यापेक्षा माणसे नियमाचे पालन करणे पसंत करतील.

पहा बुवा मला तर वाटते, तुम्ही अडचण सांगा मी त्यावर लगेच चालू सिस्टिममधला समांतर तेाडगा सांगतो. पाहू या कोण हारते ते! तुम्हीच हाराल यावर  पैज आपली!

रवीन्द्र देसाई

९८५०९५५६८०

desaisays@gmail.com

Tuesday, August 19, 2014

निमित्य आहे ......



निमित्य आहे मोहसिन शेखच्या निघृण हत्त्येचे!

राज्य कोणा एका व्यक्तीचे वा पक्षाचे नसावे; तर राज्य कायद्याचे असावे, असे आपणा सर्वांना खरोखरच वाटते का? शासन कोणा एका व्यक्तीच्या मर्जीनुसार अथवा कोणत्याही धर्मगुरुच्या फतव्यानुसार चालू नये तर ते राज्यघटनेची बांधिलकी मानून चालावे, हे आपणा सर्वांना तत्त्वतः तरी मान्य आहे का? स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव ही खरोखरच आपली जीवनमूल्ये असावीत असे आपणा सर्वांना वाटते का?
दुर्देवाने या देशातील अनेकांना ते तसे तितक्याशा पोटतिडकीने वाटतच नाही; उलट नेमक्या याच बाबी त्यांना जाचक वाटतात, किंवा स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव या संकल्पनांची त्यांची व्याख्या तरी सर्वसामान्य व्याख्येपेक्षा निराळी आहे, हीच आपली खरी अडचण आहे. कायद्याचे राज्यही संकल्पनाच आपल्यापैकी अनेकांना उमगत नाही आणि बळेबळे (म्हणजे बळाचा वापर करून नव्हे हं! आपण दगडावर डोके आपटून घेण्याचा निरर्थ प्रयत्न या अर्थाने) त्यांच्या घशाखाली ते उतरवायचा कोणी प्रयत्न केला तरी ती त्यांच्या पचनी पडत नाही. देशात सांप्रदायिक संघर्ष पेटण्याचे हेही एक प्रमुख कारण आहे. मी येथे अनेकांच्याहा शब्द काळजीपूर्वक वापरलेला आहे. बहुसंख्यकांच्या वा अल्पसंख्यकांच्या ते पचनी पडत नाही असे म्हणून मी त्यातील कोणाही एका गटाची नालस्ती वा भलावण करू इच्छित नाही. याचे कारण बहुसंख्यकांमध्येही अल्पमतातील विरोधक असतात आणि अल्पसंख्यकांमध्येही बहुसंख्यांचे मत मनोमनी त्यांच्या तथाकथित नेत्यांच्या विरोधी असू शकते. पण एक गोष्ट मात्र तितकीच खरी की हिंदू-मुसलमानांत वादंग उमटले रे उमटले की आम्ही हिंदू असो वा मुसलमान, आम्हाला लगेच केवळ आपापला धर्म आणि आपापल्या धार्मिक हितसंबंधांचीच आठवण येते. अशा वेळी आम्हापैकी बहुतेक कोणालाच मग न्यायनको असतो; आम्हा सर्वांनाच आपल्या बाजूने केवळ निकालहवा असतो.
याच वृत्तीमुळे आपणापैकी बहुतेकांना कोणत्याही घटनेचा वा गुन्ह्याचा वस्तुनिष्ठपणे आणि स्वतंत्र्यपणे विचार करणे अवघड जाते, एकाने गाय मारली (गोमाता नव्हे! म्हणी आणि वाक्प्रचारातील साधीसुधी निरुपद्रवी गाय!) म्हणून दुसऱ्याने वासरू मारणेही आपण क्षम्य मानू पाहतो - आपण म्हणजे अल्पसंख्य आणि बहुसंख्य दोघेही! किंवा गाय मारणाऱ्याला (पुन्हा तीच ती साधीसुधी म्हणी आणि वाक्प्रचारातील निरुपद्रवी गाय! गोमाता नव्हे!) शिक्षा झाली नाही म्हणून वासरू मारणाऱ्यालाही शिक्षा होऊ नये असा आग्रह याच वृत्तीतून धरला जातो. आपल्या अशिलाने गुन्हा केला आहे हे ठाऊक असूनही त्याच्या बचावासाठी त्याचा वकिल जसा धादांत खोटा युक्तीवाद करत असतो, तसेच दोन्ही बाजूंचे बोलणे असते. मात्र बहुतेक वेळी त्यात साक्षीपुराव्याचा उहापोह होण्याऐवजी, चोरी करताना रंगेहाथ पकडलेल्या एखाद्या चोराने, ‘यापूर्वी आजवर झालेल्या सर्व गुन्हेगारांना आधी शिक्षा व्हावी आणि मगच माझ्यावर खटला भरावाअशी मागणी करण्यासारखीच बालीश आणि हास्यास्पद विधाने त्या अभिनिवेशात दोन्ही बाजूंकडून केली जातात.
प्रत्येक गुन्हा वेगळा असतो, त्याचा तपास करणारे अधिकारी वेगवेगळे असतात, त्यांचा अनुभव, अभ्यास, समज, तपासकौशल्याची पातळी वेगवेगळी असते, तपासासाठी मिळणारी साधनसामग्री व सवड कमी-जास्त असते आणि त्याच बरोबरीने त्यांची कामावरील निष्ठा, वरिष्ठांचा दबाब झुगारण्याची वा आर्थिक प्रलोभनाला बळी न पडण्याची त्यांची क्षमता आणि इमानदारीही कमी-जास्त पातळीची असते. शिवाय अशास्त्रीयरित्या जमवलेला पुरावा, एैनवेळी उलटणारे बिनभरंवशाचे साक्षीदार आणि बहुसंख्य वेळा खासगी प्रॅक्टिस जमत नाही म्हणून सरकारी वकिलाची नोकरी पत्करलेले दुय्यम दर्जाचे वकील या साऱ्याची गोळाबेरीज केली तर जातीय दंग्यातील बहुतेक खटल्यामधील आरोपी निर्दोष सुटतात, यात फारसे नवल नाही. सर्वसामान्य लोकांपैकी बहुतेकांना न्यायालयाची प्रक्रिया कशी चालते याचे काडीचेही ज्ञान नसते. तीन तासाच्या हिंदी सिनेमात जेमतेम पाच मिनिटे दाखवलेले कोर्ट हीच त्यांची अनुभवाची एकमेव पोतडी! त्यामुळे आपल्या अपेक्षेनुसार निकाल लागला नाही की बहुसंख्यांकांच्या दबावापुढे न्यायालय झुकल्याची अल्पसंख्याकांची खात्रीच पटते; या उलट अल्पसंख्याकांच्या बाजूने निकाल लागला की शासनासारखीच न्याययंत्रणाही आता अल्पसंख्यांकांच्या अनुनयाची कास धरु लागली आहेत अशी पिंक टाकायला बहुसंख्यांकांच्या जहाल मतवादी संघटना तयारच असतात. यातूनच मग दोन्ही बाजूच्या कट्टरपंथीयांना बळ मिळते.


पण हे कोणीच कोणाच्या नजरेस आणून देत नाही की कोणत्याही न्यायालयातला आजवरचा कोणताही खटला हिंदू धर्म विरुध्द मुसलमान धर्म असा लढवला गेलेला नाही, असा लढवला जाण्याची शक्यताही नाही. अशा साऱ्या खटल्यांचे स्वरुप हे प्रचलित कायद्याचे एखादे वा अनेक कलमे तोडणारी व्यक्ती, संघटना वा जमाव यांच्या विरूध्द राज्य सरकार वा केन्द्र सरकार असे असते. त्याचा निकाल साक्षपुराव्याच्या जोरावर आणि कायद्याच्या कलमांनुसार होतो. त्यामुळे मुळातच अशा कोणत्याही खटल्याला जातीय रंग देण्याचे काही कारणच नाही किंवा कोणत्याही  खटल्यात आपापल्या धर्माच्या गुन्हेगाराला शिक्षा झाली तर तो आपल्या धर्माचा पराभव मानण्याचे काही कारण नाही. निकाल कसाही लागला तरी तो त्या दोन पक्षकारांपुरता जय-विजय असतो. अशा एखाद्या खटल्यातील हिंदू वा मुसलमान आरोपी (आरोपी कसले खरे खुरे गुन्हेगारच!) भले जरी तांत्रिक मुद्यांवर निर्दोष सुटले तरी त्याने त्यांच्या त्यांच्या धर्माचे तेजोवलय अधिक उजळत नाही; उलट ते झाकोळलेच जाते. हे आपण सारे स्पष्टपणे कधी बोलणार?
स्थैर्य असेल तरच विकास होतो. आणि र्स्थर्य केवळ न्याय, समता आणि बंधूभावातून येऊ शकते. स्वातंत्र्य असेल तरच नवनवोन्मेष होऊ शकतो. त्यामुळे देशाला पुढे घेऊन जायची इच्छा असेल तर आपणा सर्वांना केवळ स्वातंत्र्य, समता, बंधूभाव, कायद्याचे राज्य आणि न्यायाचाच आग्रह धरायला हवा! न्याय याचाच अर्थ निःपक्षपाती निर्णय! भय व लोभ या विकारांपलिकडे जाऊन, सद्सद्विवेक बुध्दीला स्मरून केवळ साक्षी-पुराव्यावर विसंबून प्रचलित कायद्यानुसार केलेला निवाडा! आम्हा सर्वांना त्याची आंस कधी लागणार?

कोर्टात न्याय मिळतोच असे नाही; कोर्टात जे मिळते त्याला न्याय म्हणावे लागते, कोणी तरी वैतागून म्हटलेले हे वाक्य अनेकदा खरेही ठरत असेल; कारण न्यायप्रक्रियेतही काही त्रुटी आहेत आणि न्यायसंस्थेच्याही काही मर्यादा आहेत. प्रचलित पघ्दतीत प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा होईलच असे नाही. गुन्हा करूनही गुन्हेगार राजरोस सुटून जाऊ शकेल. पण याचा अर्थ आपल्या लेखी जो कोणी गुन्हेगार असेल त्याला आपण स्वतः कायदा हातात घेऊन शिक्षा फर्मावायची नसते. तसे करणे नुसतेच बेकायदेशीर नव्हे तर रोगापेक्षा औषध भयंकर असेच ठरेल. आँख के बदले आँख असे सूडसत्र चालू राहिले तर सारी मानवजातच आंधळी होऊन जाईल, हे लक्षात घ्यायला नको का?

Friday, October 9, 2009

7) माकडचेष्टा

मंडळी, माकडांची टोळी कधी बधितली आहेत? माकडे जेव्हा निवांत असतात तेव्हा ती काय करतात हे कधी निरखून पाहिले आहेत? प्रत्येक माकड दुसय्राचे केस विंचरून त्यात उवा शोधत राहाते. आणि ऊ सापडली की चक्क खाऊन टाकते. (वाचून तोंडाला पाणी तर नाही ना सुटले?)

पण खरेच, माकडे असे का करतात? मुळात म्हणजे अनेकांना वाटते तशी माकडे शुद्ध शाकाहारी नसतात. ती जरी शिकार करून मांस खात नसली तरी छोट्या अळ्या, किडे, किटक अशा गोष्टी फलाहाराबरोबर तोंडी लावायला त्यांना चालतात. तेवढ्याने त्यांचा उपास बिल्कूल मोडत नाही. त्यामुळे सापडलेली ऊ त्यांनी तोंडात टाकणे, ही बाब फारशी नवलाची नाही.

नवल याचे आहे की इवलीशी ऊ शोधण्यात इतका वेळ वाया घालवण्यापेक्षा तेवढ्या वेळात आपण आणखी चार झाडे धुंडाळून त्याच्या कितीतरी पटीने अधिक फळे मिळवू शकू, एवढे सुचण्याइतकी अक्कल त्यांना असूनही ती तशी वागतात. पण त्यापेक्षाही नवल म्हणजे इतका वेळ वाया घालवून ती माकडे स्वतःच्या अंगावरच्या नव्हे तर इतरांच्या अंगावरील उवा शोधत असतात. स्वतः निवांतपणे झोपायचे सोडून ती बापडी, दुसय्राच्या अंगावरच्या उवा मारून त्याला निवांतपणे झोप घेता यावी याची फिकिर करीत स्वतः जागी राहातात.

सबब, 'परोपकारते तुझेच नाव माकड', असे म्हणूया का?

नाही बरे मंडळी, माकडे अशी परोपकारी बिल्कूल नसतात. पण त्यांना एवढे नक्की कळते की शेजाय्राच्या अंगावरच्या उवा मारायचा मी कंटाळा केला तर रात्री त्याच उवा माझ्या अंगावर येऊ शकतील. जर मला माझे अंग ऊ विरहित ठेवायचे असेल तर मला माझ्या शेजाय्राचे अंगही ऊ विरहित ठेवायला हवे, या अत्यंत स्वार्थी विचाराने पण अत्यंत 'कार्यक्षमते'ने ती उवा मारायचे काम करतात.

जे माकडांसारखा क्षुद्र प्राण्यांना समजते ते तुम्हा-आम्हाला का कळू नये?

'भ्रष्टाचार' आणि 'अकार्यक्षमता' नावाच्या आपल्या समाजाच्या शरीरावरील उवा आपल्यालाही अशाच मारायच्या आहेत. त्यासुद्धा दुसय्रांसाठी नव्हे, तर चक्क अगदी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी!!

याचे साधे कारण आपल्या समाजजीवनातील भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता खुद्द आपल्यालाच त्रासदायक ठरत आहेत. आपले कोणाचेच कोणतेच काम धड होत नाही आहे, याचे मूळ भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता यामध्येच आहे. इथल्या महागाईलाही भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमताच खतपाणी घालते आहे. अटकाव केला नाही तर या दोन्ही गोष्टी अशाच चक्रवाढगतीने वाढत राहातील. मग तुमची लाडकी मुले किंवा दूधावरील साय असलेली तुमची लाडकी नातवंडे जेव्हा इथे फुलूफळू बघतील तेव्हा त्यांच्या वाटणीला काय येईल?

त्यांच्या नशीबी होरपळ यायला नको असेल तर भ्रष्टाचाराचा आणि अकार्यक्षमतेचा हा वणवा आपण सर्वांनीच पुरता विझवायला हवा. आणि तेच आपले तातडीचे आणि एकमेव ध्येय असायला हवे.

अनेकांचा असा गैरसमज असतो की मुलाबाळांसाठी खूप पैसा राखून ठेवला की ती सुखाने राहू शकतील. त्यामुळे ते भल्याबुय्रा कोणत्याही मार्गांचा अवलंब करून खूप पैसे मिळवण्याच्या नादी लागतात. असे भल्या-बुय्रा मार्गाचा विधिनिषेध न बाळगता पैसे मिळवावेत की नाही, पैशातून खरे सुख विकत मिळते का, असे आध्यात्मिक वाटणारे प्रश्न एकवेळ बाजूला ठेवले तरी, मुला-नातवंडांच्या वेळेपर्यंत प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता पूर्णपणे रसरतळाला गेली असताना, ते त्या पैशांतून सुख तरी विकत घेऊ शकतील का, एवढा तरी भौतिक विचार आपण करायला नको का?

नुसतेच तिकिटाचे पैसे जमा करून काय फायदा? तुमच्या मुलाबाळांनी जीवनाचा पैलतीर ज्या होडीतून गाठायचा आहे, ती होडी आत्तापासून सुस्थितीत ठेवलीत तरच तुमची मुलेबाळे सुरक्षित आणि सुखाचा प्रवास करू शकणार आहेत. 'भ्रष्टाचार' आणि 'अकार्यक्षमता' नावाची आपल्या हाताने आपणच समाजजीवनाला पाडत असलेले ही भोके आपण बुजवली नाहीत तर काय होईल, ते सांगायला का हवे? बुडत्या माणसाला ढीगभर नोटासुद्धा वाचवू शकतील, असे निदान मला तरी वाटत नाही. आपल्या मुलाबाळांसाठीची ती होडी प्रवासक्षम राखायचा आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. हा पुढाकार दुसय्रा कोणी नव्हे, आपण स्वतः यायचा आहे. हा तुमच्या-माझ्या मुला-बाळांच्या, आपल्या नातवंडा-पंतवंडांचा जीवनमरणाचा प्रश्न आहे. इतर कोणी साथ देवोत न देओत, आपण स्वतःपुरते तरी प्रत्येक बाबतीत भ्रष्टाचारापासून चार हात दूर राहाण्याचा आणि कार्यक्षम ठरायचा प्रयत्न करूया!

रवीन्द्र देसाई

If you find it difficult to post a comment in Marathi, you are welcome to make a contact with me either on desaisays@gmail.com or on 9850955680 / 020 2457 5575.

Let us make this world a bit better, together!

6) Think..... Differently! वेगळा विचार करा.


शिक्षकाने गुण दिले शून्य! चक्क भोपळा!! आणि विद्यार्थी म्हणतोय, ''मला शंभरपैकी शंभर गुण हवेत.''

फरक दोन-पाच गुणांचा असता तर कदाचित काही तरी तडजोड होऊ शकली असती पण शिक्षक तर एकही गुण द्यायला तयार नाही आणि विद्यार्थी तर पैकीच्या पैकी गुणांसाठी हटून बसलेला!

फिजिक्सच्या परिक्षेतला तो प्रश्न होता, ''एखाद्या उंच इमारतीची उंची बॅरोमीटरच्या सहाय्याने कशी काढता येईल?'' आणि विद्यार्थ्याने उत्तरादाखल लिहिले होते, 'एक मोठी दोरी घ्यावी. दोरीच्या एका टोकाला बॅरोमीटर बांधावा. इमारतीच्या गच्चीवरून दोरी खाली सोडावी. बॅरोमीटर जमिनीला टेकला की दोरी पुन्हा वर ओढून घ्यावी. दोरीची लांबी फूटपट्टीने मोजावी. दोरीची जी लांबी भरेल ती इमारतीची उंची समजावी.'

आपापसात वाद मिटेना म्हटल्यावर दोघेजण हेडमास्तरांकडे आले. सारी कहाणी ऐकून हेडमास्तरांनी महत्‌ प्रयसाने आपले हासू दाबले आणि गंभीरपणे ते म्हणाले, ''इमारतीची उंची बॅरोमीटरच्या साहाय्याने अशीही मोजता येईल हे खरेच, पण फिजीक्सच्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नाला उत्तर देताना त्यात पदार्थ-विज्ञानात शिकवलेल्या तत्वांचा काहीतरी वापर हवाच. ठीक आहे, मी तुला आणखी एक संधी आणि पाच मिनिटाची सवड देतो. तू विचार करून दुसरे काहीतरी उत्तर सांग. पण त्या उत्तराचा, पदार्थ-विज्ञानाशी मात्र संबंध हवा हं!''

चार मिनिटे झाली तरी विद्यार्थी हाताची घडी घालून तसाच शांतपणे उभा राहिलेला होता. मग हेडमास्तरच त्याला म्हणाले, ''काय झाले? नाही सुचत दुसरा काही मार्ग?''

विद्यार्थी शांतपणे म्हणाला, ''मला एकच काय, पण अनेक मार्ग सुचले आहेत. मी फक्त आधी कोणते उत्तर द्यावे, याचा विचार करतो आहे.''

उत्सुकतेने हेडमास्तर म्हणाले, ''अच्छा, सांग बघू एक तरी!''

विद्यार्थी म्हणाला, ''बॅरोमीटर घेऊन पुन्हा एकदा गच्चीवर जायचे. तेथून तो बॅरोमीटर खाली टाकायचा. बॅरोमीटर जमिनीवर आदळायला जेवढा वेळ लागेल तो वेळ स्टॉप-वॉचच्या सहाय्याने मोजायचा. आता s=((u+v)/2)t या सूत्रानुसार इमारतीची उंची काढता येईल.''

वर्गशिक्षकांकडे वळून हेडमास्तरांनी विचारले, ''आता यावर तुमचे काय म्हणणे आहे?''

उत्तरामध्ये पदार्थ-विज्ञानातील तत्वाचा पुरेपूर सामावेश असल्याने वर्गशिक्षक चडफडत निघून गेले. त्यांच्या मागोमाग तो विद्यार्थीही जायला वळला तेव्हा हेडमास्तरानी त्याला खूण करून थांबवले आणि म्हणाले, ''तू मगाशी म्हणालास आणखीही काही मार्गानी याचे उत्तर तुला सांगला येईल. कळू देत तरी आणखी कोणते मार्ग तुला ठाऊक आहेत ते!''

विद्यार्थी म्हणाला, ''एक मार्ग म्हणजे बॅरोमीटर घेऊन पुन्हा एकदा गच्चीवर जायचे. बॅरोमीटरला दोरी बांधायची. वरच्या गच्चीतून बॅरोमीटर खाली सोडायचे. ते जमिनीला जेमतेम टेकले की त्याला लंबकाप्रमाणे झोका द्यायचा. आता लंबकाचा आंदोलन-काल मोजून त्यावरून इमारतीची उंची काढता येईल''

हेडमास्तर म्हणाले, ''छान. आणखी?''

विद्यार्थी म्हणाला, ''अजूनही अेक मार्ग आहे. लख्ख ऊन पडले असेल तेव्हा बॅरोमीटरच्या सावलीची लांबी मोजाची., तशीच इमारतीच्याही सावलीची लांबी मोजायची. आता बॅरोमीटरची उंची मोजायची. बॅरोमीटरच्या सावलीचे आणि उंचीचे जे गुणोत्तर येईल त्याने इमारतीच्या सावलीला गुणले की इमारतीची उंची कळेल''.

हेड मास्तरांना पुनः प्रश्न विचारायची संधी न देता तोच पुढे म्हणाला, ''आणखीही एका वेगळ्या प्रकारे आणि अगदी साध्या पद्धतीने याच बॅरोमीटरच्या साहाय्याने अगदी अल्पशिक्षितालाही इमारतीची उंची काढता येईल. जिन्याच्या पायरीशी बॅरोमीटर उभे करून ठेवायचे. आणि त्याच्या उंचीची पेन्सिलने खूण करायची. त्या खूणेवर पुन्हा बॅरोमीटर उभे करायचे आणि दुसरी खूण करायची. असे करीत करीत इमारतीच्या सर्व पायया चढायला सुरुवात करायची. बॅरोमीटरच्या एकूण जितक्या खुणा होतील, त्या खुणांना बॅरोमीटरच्या उंचीने गुणले की येणारा गुणाकार इमारतीच्या उंची एवढा असेल.''

''आहे खरा अगदी अडाण्यालाही वापरता येईल असा मार्ग!'' हेडमास्तरांनी मनापासून दाद देत म्हटले. तशी तो म्हणाला आता सांगणार आहे तो उपाय पदार्थ-विज्ञानापेक्षा व्यवहारावर जास्त आधारित आहे. बॅरामिटर यायचा; तळमजल्यावरील इमारतीच्या सुरक्षा अधिकार््याच्या केबिनच्या दारावर टकटक करायचे; त्याने दार उघडले की त्याला म्हणायचे, ''साहेब, माझ्याकडे एक मौल्यवान बॅरोमीटर आहे. जर तुम्ही या इमारतीची नेमकी उंची सांगितलीत तर मोबदला म्हणून मी तो बॅरोमीटर तुम्हाला बक्षिस देईन.''

हेडमास्तरांनी आता मात्र त्याच्यासमोर कोपरापासून हात जोडले आणि म्हणाले, ''फार शहाणा आहेस, पळ!''

पण जसा तो मुलगा जायला लागल तसे त्यांनीच त्याला पुन्हा एकदा थांबवले आणि म्हणाले, ''पण काय रे! मला आता एकच सांग, बॅरोमीटरने इमारतीची उंची नेहमी कशी मोजतात, हे तुला खरेच ठाऊक नाही का?''

विद्यार्थी म्हणाला, ''ठाऊक आहे की! पण एका ठराविक साच्याने, साचेबंद पद्धतीनेच विचार करायची जी पध्दत सर्वत्र शिकवली जाते, तिचा मला तिटकारा आहे''!!

मंडळी, 'क्वांटम थेअरी'चा उद्गाता आणि अमेरिकेचा सुप्रसिध्द अणुशास्त्रज्ञ, 'नील बोर' याच्या बालपणीची ही गोष्ट आहे म्हणे! खरे खोटे नील बोरच जाणे!!

गंमत म्हणजे आपल्याकडे सुध्दा अशा उदाहरणांना तोटा नाही. लोकमान्य टिळकांनी शाळेमध्ये असतांना 'संत' हा शब्द 'संत', 'सन्त' आणि 'सन्‌त' अशा तीन वेगवेगळ्या पध्दतींनी लिहीला होता. नील बोरच्या शिक्षकांप्रमाणेच आपले म्हणणे बरोबर आहे हे सिध्द करण्यासाठी त्यांनाही शिक्षकांशी भांडायला लागले होते पण अशी बंडखोरी करणारे टिळकच पुढे लोकमान्य म्हणून प्रसिध्दीस आले आणि धोपट मार्गाने 'संत' हा शब्द लिहिणारे त्यांचे शिक्षक मात्र विस्मृतीत गेले.

कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही समस्या आपण एका ठराविक चौकटीतून, एका ठराविक दृष्टीकोनातून, एका ठराविक पध्दतीनेच पाहातो. पण कोणत्याही गोष्टीकडे थोडाशा वेगळ्या पध्दतीने पाहिले तर आपल्या आयुष्यातील अनेक समस्या आपण उपलब्ध साधनसामुग्रीतूनच सोडवू शकतो. गंमत म्हणून मी आणखी अेक मजेदार गोष्ट सांगतो.

अेका व्यापार॒याने अेका सावकाराकडून काही कर्ज घेतले होते. दुर्दैवाने तो ते कर्ज वेळेवर फेडू शकला नाही. कर्जफेडीसाठी सावकार अगदीच नडून बसला. व्यापार॒याने जादा व्याज द्यायची तयारी दाखवूनही सावकार मुदत वाढवून द्यायला राजी होअीना. सावकाराला त्या रकमेची निकड होती, असे मुळीच नव्हते पण त्याच्या मनात पाप होते. व्यापार॒याच्या तरुण, सुंदर मुलीवर याचा डोळा होता. वेळेवर कर्जफेड न केल्याबद्दल, त्या काळच्या नियमाप्रमाणे व्यापार॒याला तुरुंगात जावे लागले असते. या अडचणीचा फायदा घेऊन सावकाराने त्याच्यापुढे प्रस्ताव ठेवला की, जर व्यापार॒याने आपल्या मुलीचा विवाह त्याच्याशी लावून दिला तर तो खटलाही काढून घेईल आणि कर्जही माफ करेल.

व्यापारी मोठा धर्मसंकटात पडला. वयाने किती तरी मोठा असलेल्या या दुष्टबुद्धी सावकाराशी आपल्या लाडक्या लेकीचे लग्न लावून द्यायचे त्याचे मन होईना. पण प्रस्ताव नाकारावा तर तुरुंगाची हवा चाखावी लागणार आणि अेकदा बेअब्रू झाली की पुढेही व्यापारात जम बसायचीही शक्यता उरत नव्हती. काय करावे?

व्यापार॒यापेक्षा खरी संकटात पडली ती त्याची मुलगी! वडिलांसाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करावा तर सारा जन्म अेका खत्रुडाबरोबर काढावा लागणार आणि केवळ स्वतःच्या सुखाचा विचार करावा तर वडिलांना तुरुंगात खडी फोडावी लागणार! काय करावे?

बाप-लेक दोन्हीही पुरतेच कचाटात सापडले होते.

पण सावकार केवळ पापी आणि लंपटच नव्हता तर धूर्तही होता. 'परिस्थितीचा गैरफायदा घेऊन आपण हा निर्णय तिच्यावर लादला,' असे म्हणत सारा जन्म आपला राग राग करायची तिला संधी मिळू नये; 'हा विवाह अेक दैवी अिच्छाच होती,' असे तिला भासावे, यासाठी त्याने अेक युक्ती केली. बाप-लेकीला घेऊन तो अेका बागेत फिरायला गेला. बागेत पायवाटेवर छानशी वाळू पसरलेली होती. त्यात काळ्या आणि पांढर॒या रंगाचे असंख्य खडे अणि गारगोटा विखुरल्या होत्या. अिकडचे तिकडचे बोलत बोलत, खाली वाकून, गुपचूपपणे सावकाराने त्यातले दोन बारीक खडे उचलले आणि दोघांनाही ते न दाखवता, आपल्या जवळील अेका बटव्यात टाकले. मग व्यापायाकडे वळून मानभावीपणे म्हणाला, 'मी या बटव्यात अेक काळा आणि अेक पांढरा असे दोन खडे टाकले आहेत. आता डोळे झाकून हिने बटव्यात हात घालून अेक खडा बाहेर काढावा. जर तो खडा काळा असेल तर मी तुला कर्जही माफ करेन आणि हिने माझ्याशी लग्न करण्याचीही अट घालणार नाही पण जर तिच्या हातात गारगोटीचा पांढरा खडा आला तर मात्र हिला माझ्याशी लग्न करावे लागेल आणि मग अर्थातच मी तुझे कर्जही माफ करेन.''

छाप असो वा काटा, काहीही असले तरी आपले कर्ज माफ होणार याचाही त्या बिचार॒या व्यापार॒याला आनंद घेता येत नव्हता, कारण मुलीच्या हाती पांढरा खडा आला तर.......?

आणि सावकाराचे बोलणे अैकून मुलगी तर पांढरीफटकच पडायच्या बेतात आली. कारण आपण ते खडे गुपचूपपणे अुचलले असे सावकाराला जरी वाटत होते, तरी त्याने दोन्ही पांढरेच खडे अुचलले आहेत, हे तिने पाहिले होते. याचा अर्थ डोळे झाकूनच काय पण डोळे टकटकीत अुघडे ठेऊन जरी बटव्यातून कोणताही खडा काढला तरी तो पांढराच असणार होता! म्हणजे काही झाले तरी सावकाराशी लग्न करावे लागणे अटळच होते.

काय करावे?

ही कहाणी आहे खूपखूप वर्षांपूर्वीची! वयाने, धनाने, मानाने, ज्ञानाने जेष्ठ असलेला माणूस जरी उघडउघड खोटेपणा करीत असला तरी तसे स्पष्ट बोलून दाखवायची त्या काळी पद्धत नव्हती. विशेषतः मुलीने आणि कुलीन घरातल्या स्त्रीने तर असा उध्दटपणा करणे तर शांतम्‌ पापम्‌! वडिल माणसे पूजनीय असली तरी त्यांच्याबद्दल मुळीच आदर न बाळगणे, ही २१ व्या शतकातील, हल्लीची 'फॅशन' आहे. तेव्हा तशी रीत नव्हती. त्यामुळे ती बिचारी सावकाराची लबाडी डोळाचे पाहूनसुद्धा तो खोटेपणा अुघड करू शकत नव्हती.

काय करावे?

मंडळी, क्षणभर आपण त्या मुलीला विसरून जाऊ. समजा तुम्ही तिच्या जागी असता, तर तुम्ही काय केले असतेत? किंवा समजा तुम्ही तिचे सल्लागार असता तर तिला काय करायचा सल्ला दिला असतात?

आणि अिथे आपली 'विचार करायची क्षमता' स्पष्ट होते. 'विचार करायची क्षमता' म्हणण्यापेक्षा 'विचार करायची पद्धत' स्पष्ट होते, असे म्हणणे अधिक सयुक्तिक आहे.

'अेडवर्ड डी बोनो' नावाच्या तत्त्वचिंतकाच्या 'लॅटरल थिंकिंग' नावाच्या पुस्तकातली ही गोष्ट मला परवा दुसर॒याच अेका लेखात वाचायला मिळाली. बोनोने पुढे त्यातून आपल्यापैकी बहुसंख्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीचे विष्लेषण केले आहे, (म्हणे!) मी स्वतः अजून 'लॅटरल थिंकिंग' वाचले नाही. पण बोनोच्या विष्लेषणापेक्षा गोष्टीचा शेवट काय झाला हे जाणून यायची तुम्हाला जास्त अुत्सुकता असणार, हे मला पक्के ठाऊक असल्याने बोनोच्या (मी न वाचलेल्या!) विष्लेषणात तुम्हाला न अडकवता, आधी गोष्टीचा शेवट सांगूनच मोकळा होतो कसा!

त्या मुलीने शांतपणे डोळे मिटले. डोळे मिटून शांतपणे बटव्यात हात घातला. बटव्यातील अेक खडा डोळे मिटूनच मुठीत घेतला. डोळे मिटूनच मूठ बाहेर काढली. हात अुताणा करून मूठ अुघडण्याअैवजी, डोळे अुघडण्यापूर्वीच गडबडीने पालथ्या हातानेच मूठ उघडली. कोणी बघण्याआधीच तो चिमुकला खडा वाटेवर पसरलेल्या काळ्या-पांढर॒या अगणित खडात मिसळून गेला. पावसाच्या अेखाद्या थेंबाचे अस्तित्व महासागरात विरून जावे, तसा तो गारेचा छोटा खडा वाळूच्या असंख्य कणांत लुप्त झाला.
तिने शांतपणे डोळे अुघडले. अपराधी चेहरा करून ती पश्चात्तापदग्ध आवाजात म्हणाली, 'किती वेंधळी आहे मी! साधीसुधी गोष्टसुद्धा मला जमत नाही!!' पण झाल्या चुकीचे परिमार्जन अजूनही करता येणे शक्य आहे याचा बहुधा तिला अेकदम बोध झाला असावा. कारण ती लगेचच आश्र्वासक स्वरात म्हणाली, 'तरी फारसे काही बिघडले नाही. बटव्यात अजून दुसरा खडा शिल्लकच आहे. त्याचा रंग पाहिला की हातातून पडलेला खडा काळ्या रंगाचा होता की पांढर॒या रंगाचा, ते स्पष्टच होईल.'

झाल्या चुकीतून तिने पक्का धडा घेतला असावा. या वेळी तिने बिल्कूल वेंधळेपणा केला नाही. खडा हातातून पडणार नाही याची पुरेपुर काळजी घेऊन, विजयी मुद्रेने तिने शिल्लक राहिलेला पांढरा खडा बाहेर काढला!

मंडळी, आपल्या दैनंदिन आयुष्यातही असेच पेच आपल्याला क्षणोक्षणी भेडसावत असतात. तसे पाहिले तर त्यांचे अुत्तरही या कहाणी अितकेच साधे सोपे असते. पण का कोण जाणे, आपणा कोणालाच ते कधी सुचत नाही. याचे कारण आपल्यामध्ये विचार करण्याची क्षमता नाही, असे मुळीच नाही. विचार करण्याची आपली पद्धत चुकीची असते, असेही नाही. थोडा विचार केलात तर.... आणि तो विचारही थोडा वेगळ्या पद्धतीने केला तर आपली कोणतीही समस्या सुटू शकते. मात्र त्यासाठी ही जरा वेगळ्या तर॒हेने विचार करण्याची अेक नवी कला शिकावी लागेल. या कलेचे नाव आहे, Think. Differently!

Think. Differently! असे ज्यावेळी मी तुम्हाला म्हणतो आहे त्यावेळी मी हे दोन्ही शब्द स्वतंत्रपणे म्हणतो आहे. Think आणि Differently! वेगळ्या पध्दतीने तर कराच पण त्याहून महत्वाचे म्हणजे प्रथम स्वतः विचार करा. कोणताही विचार मग भले तो चूकीचा का असेना, पण तसा विचार करायला आणि मांडायला मुळीच कचरू नका. यातूनच तुमच्या समस्येवरचा तोडगा निघायचा असतो. पण हाती असलेला इतका साधासोपा उपाय सोडून आपण आपली समस्या कोणी पुढारी सोडवेल का, म्हणून त्याच्याकडे आशाळभूतपणे पाहातो.

मंडळी, परिणामतः आपण सारे पुढार॒यांच्या ताटाखालची मांजरे बनलो आहोत. मिंधे झालो आहोत. त्यामुळे या सार॒या पुढार॒यांनी पु. ल. म्हणाले तसे तुर्तास आपली सारी संस्कृती 'गप्प बसा' संस्कृती बनवली आहे. कोणीही, काहीही उलटा प्रश्न किंवा कोणतीही शंका विचारलेली त्यांना खपत नाही. विशेषतः राजकीय पक्षांमध्ये आणि त्यांच्या संबंधीत संघटनांमध्ये तर ही गोष्ट फारच प्रकर्षाने आढळते. कोणताही राजकिय पक्ष याला अपवाद नाही. 'हाय-कमांड' सांगेल ते खरे, ही नवी दळभद्री पध्दत सर्वत्र शिकवली जाते आणि तिचे कटाक्षाने पालन करून घेतले जाते. 'हाय-कमांड'च्या निर्णयावर शंका यायची नाही; 'हाय-कमांड' चुकत असेल असे मनातही आणायचे नाही; असे का?

मी इथे कोणत्याही पक्षाचे वा संघटनेचे नाव घेत काही नाही कारण त्यातून मूळ प्रतिपादन बाजूलाच राहाते आणि केवळ वादावादीच निर्माण होते. पण समजा अेखाद्या संघटनेच्या प्रमुखाचे अमुक अमुक म्हणणे चूकीचे आहे, असे मी म्हटले की तर लगेच ती संघटना म्हणणार, 'त्यांची चूक काढायला तुम्ही असे कोण शहाणे लागून गेलात? त्यांचे म्हणणे समजून यायची तरी पात्रता आहे का तुमची? तेवढा तुमचा अधिकार आहे का? तेवढा तुमचा अभ्यास आहे का? तुमची लायकी ती काय...''. वगैरे वगैरे...

पण या उलट मी जर त्या संघटनेच्या प्रमुखाचे अमुक एक म्हणणे बरोबर आहे, असे म्हणालो तर मात्र हेच संघटनावाले असे कधीच म्हणणार नाहीत, 'अरे वा देसाई, यांचे म्हणणे बरोबर आहे असे प्रशस्तीपत्र तुम्ही कोण देणार? तुम्ही असे कोण शहाणे लागून गेलात? त्यांचे म्हणणे समजून यायची तरी तुमची पात्रता आहे का? तेवढा तुमचा अधिकार तरी आहे का? तेवढा तुमचा अभ्यास तरी आहे का? तुमची लायकी ती काय''.... वगैरे वगैरे...
छान! म्हणजे एखाद्या माणसाला बरोबर म्हणताना, त्याचा अनुयायी होताना मी अभ्यास केला नसला तरी चालतो; माझा त्या विषयातला काही अधिकार नसला तरी चालतो, पण त्या माणसाला विरोध करताना मात्र, माझा त्या विषयाचा अभ्यास असणे आवश्यक धरले जाते, यामध्ये काहीतरी चुकीचे आहे असे तुम्हाला जाणवत नाही का? न्याय लावायचा तर तो दोन्ही बाजूला लावणे आवश्यक आहे अन्यथा याचा अर्थ एवढाच होतो आम्हाला आंधळे अनुयायी हवेत; थोडासुध्दा स्वतंत्रपणे विचार करणारे लोक नकोत!

एक सामर्थ्यवान देश बनविण्यासाठी हे योग्य ठरेल का, याचा विचार करणे खरोखरच आवश्यक आहे. अन्यथा देश बलवान जरूर बनेल; पण ते सारे बळ केवळ खांद्याखालचे असेल. आपल्याला हे अपेक्षित आहे का? Think. विचार करा. पण Differently! स्वतंत्रपणे विचार करा.

चला मंडळी, दुसर॒यांच्या विचारांच्या कुबड्या न घेता, आपल्या समस्यांची अुत्तरे आपणच शोधून काढू. पण त्यासाठी माझ्यावर नव्हे, पण माझ्या या सांगण्यावर विश्र्वास ठेवा, की प्रत्येक समस्येला अुत्तर असतेच. प्रत्येक रावणानंतर राम आणि प्रत्येक कंसानंतर अेक कृष्णही जन्माला येतच असतो. जगात सारेच अशाश्वत असेल तर तुमच्या समस्या तरी चिरंतन कशा राहातील? त्यांनाही शेवट असतोच! आणि तुमच्या समस्येवरचे अुत्तर शोधून काढण्याची क्षमताही तुमच्यातच असते.

दुसर॒या कोणाचे अनुयायी व्हायची आणि दुसर॒या कोणाचा जयजयकार करायची तुम्हाला गरजच नाही. तुम्ही स्वयंभू आहात. तुम्ही स्वयंपूर्णच आहात.


रवीन्द्र देसाई
If you find it difficult to post a comment in Marathi, you are welcome to make a contact with me either on desaisays@gmail.com or on 9850955680 / 020 2457 5575.
Let us make this world a bit better, together!


Tuesday, October 6, 2009

5) परीसस्पर्श

परीसस्पर्श

परीस म्हणून एक खडा असतो (म्हणे!). त्याचा स्पर्श लोखंडाला झाला तर त्या लोखंडाचे रूपांतर सोन्यामध्ये होते (हेही म्हणेच बरे कां!). कारण, मी स्वतः काही असा लोखंडाचे सोने बनवणारा परीस पाहिलेला नाही; पण अशा परीसस्पर्शापेक्षा सुद्धा अधिक आश्चर्यकारक आणि मूल्यवान एक स्पर्श मला ठाऊक आहे; तो म्हणजे 'आपुलकीचा स्पर्श'!

आपुलकीचा हा परीसस्पर्श ज्या कामाला कराल ते काम आनंददायीही होऊन जाते. मग मुळात ते भले कितीही कंटाळवाणे आणि किचकट का असेना!

अगदी साधे उदाहरण लक्षांत या. रस्त्यातून आपण जात असतो. गरिबांघरची मुले रस्त्यात गोटा खेळत असतात. धुळीमध्येच खेळत असल्याने त्यांचे हात-पाय पांढरे झालेले असतात. कपडे सगळे मळून गेलेले असतात. डोक्यामध्ये माती गेलेली असते. केस अस्ताव्यस्त झालेले असतात. एखादे पोरगे फारच छान (!) असले तर त्याच्या नाकातून पांढरे-पिवळे कांहीतरी लोंबत असते. आपण त्या पोरांकडे बघतो आणि शहारून, अंग झटकून, त्यांना ओलांडून तसेच घाईघाईने पुढे निघून जातो.

आपण आपल्या घराजवळ येतो, घराचा दरवाजा उघडतो. आणि काय होते? आपण दरवाज्यात आहोत असे बघितल्यावर रस्त्यात खेळणारे एखादे पोर धावत धावत येते आणि ''बाबा'' म्हणून आपल्या पायांना मिठी घालते. ते पोरही रस्त्यातच खेळत असते. त्यामुळे त्याचेही अंग, हात-पाय धुळीने पांढरे झालेले असतात. त्याच्याही डोक्यामध्ये माती गेलेली असते. त्याचेही कपडे मळलेले असतात. जर तुम्ही फारच नशीबवान असलात तर त्याच्याही नाकातून तसाच पांढरा-पिवळा कांहीतरी पदार्थ बाहेर लोंबत असतो.
आता तुम्ही काय करता? तुम्ही शहारून, अंग झटकून थोडेच घरात जाता? छे! उलट तुम्ही त्या पोराला जवळ घेता. खिशातून परीटघडीचा रुमाल काढता. त्याचे तोंड पुसता. त्याचे ते नाक पुसता आणि त्या पोराचा झकासपैकी पापा घेता.

कशामुळे घडते असे?

एक आपुलकीची भावना - एक आपुलकीचा स्पर्श त्या मुलाचा तो सगळा घाणेरडेपणा दूर करतो आणि ते पोरगे तुम्हाला जवळ यावेसे वाटते. केवळ त्याच्यासाठी जगावेसे वाटते. त्याच्यासाठी काम करावेसें वाटते.
हे जे त्या पोराच्या बाबतीत खरे आहे, तेच आपल्या स्वतःच्या कामाबाबतीतही खरे आहे. ''हे काम मला साहेबांनी सांगितले आहे, हे काम माझे नाही'', असें जेव्हा म्हणाल तेव्हा ते काम करण्यामध्ये तुम्हाला गोडीच वाटणार नाही. ते काम तुमच्या डोक्यावरचे एक मोठे ओझे बनून राहील. ते काम नकोसे वाटेल. ते काम करताना कंटाळा येईल. ते काम करताना थकल्यासारखे वाटेल.

या उलट, हे काम माझे स्वतःचे आहे याच्यातून माझा आत्माविष्कार घडणार आहे, मला काय करता येते हे मी याच्यातून दाखवून देणार आहे, असं म्हणालात तर?

तर मघाशी सांगितले तसे आपुलकीच्या त्या परीसस्पर्शाने तुमच्या कामाचे रुपच एकदम बदलून जाईल. तुमच्या कामाचा दर्जा - तुमच्या कामाची क्वालीटी - बदलून जाईल.

असे खरेच करुन बघा. आपले काम स्वतःसाठी अधिक आनंददायी बनविण्यासाठी, आपल्या कामाला अर्थ देण्यासाठी, आपल्या जीवनाला अर्थ देण्यासाठी, आपल्या कामावर प्रेम करा. आपले काम आपले म्हणून करा.

आणि तसे करायला लागलात की वेगळे कांहीही करायला लागत नाही. हे का करायचे आहे? तर ती माझी गरज आहे म्हणून करायचे आहे. कामाची गरज आहे म्हणून नव्हे! यातून माझा आत्माविष्कार व्हायचा आहे. आणि माझा आत्माविष्कार झाला तरच माझे जीवन सफल व्हायचे आहे. अन्यथा बाकी सगळा गोष्टी मिळवून देखील मी प्रत्यक्षांत कांहीच मिळवणार नाही.

बरोबर आहे? पटतय? करणार अशी सुरुवात? उद्यापासून? नव्हे, आत्तापासून?

तर मग आपला हा निश्चय लक्षात ठेवायला सोपे जावे यासाठी, या सायाचा गोषवारा म्हणून मी फक्त एकच शब्द लिहितो .......... आपुलकीचा परीसस्पर्श!
(अरेच्चा, एक म्हणता म्हणता मी दोन शब्द लिहिले. पण तेवढे सांभाळून /या. नाही तरी 'चार शब्द' बोलायला म्हणून उभ्या राहिलेल्या वक्त्याकडून स्वतःला तासभर पिळून यायची आपणा सर्वांना सवय आहेच की!)


रवीन्द्र देसाई

If you find it difficult to post a comment in Marathi, you are welcome to make a contact with me either on desaisays@gmail.com or on 9850955680 / 020 2457 5575.

Let us make this world a bit better, together!

Sunday, October 4, 2009

4) मॅच-फिक्सिंग

वूल्मर यांच्या हत्त्येस आपणापैकी अनेक जणही जबाबदार?

हॅन्सी क्रोनेची आणि वूल्मर यांची हत्त्या मॅच फिक्सिंगच्या संदर्भातच झाली, असे म्हटले जाते. सट्टेबाजीमुळे किंवा सट्टेबाजीसाठी मॅच फिक्सिंग होते. ही सट्टेबाजी कोटावधी रूपयांची असते. पण सगळात महत्त्वाचे म्हणजे सट्टेबाजीसाठी लागणारी रक्कम ही सट्टेबाजांचे स्वतःचे भांडवल नसते. अनेकांनी लावलेल्या १०-२०-५०-१००-१००० अशा छोटया छोटया रकमांतूनच ती अवाढव्य रक्कम उभी होते. त्या रकमेच्या जोरावरच हे समाजविघातक सट्टेबाज खेळाची रंगत आणि पावित्र्य तर घालवतातच पण वेळच आली तर स्वतःची कातडी बचावण्यासाठी स्वतःच्या हितशत्रूंचा असा काटा काढायलाही मागे-पुढे पाहात नाहीत. प्रत्यक्ष गुन्हेगाराइतकेच त्याचे साथीदारही दोषी असतात; याचाच वेगळया शब्दात अर्थ असा की, मॅचच्या निकालावर 'गंमत' म्हणूनसुद्धा किंवा 'टाईम-पास' म्हणूनसुद्धा जे जे कोणी पैसे लावतात, त्या सायांचे हात या दोघांच्या रक्ताने बरबटलेले आहेत.

तुम्ही त्यातले एक आहात का?

नसाल तर फारच छान! असेच आग्रहपूर्वक बेटिंगपासून दूर रहा. असाल तर अजून तरी सावध व्हा. 'गंमत', 'थ्रील' वा 'टाईम-पास'साठी खूप चांगले मार्ग उपलब्ध आहेत. स्वतःच्या किरकोळ फायद्यासाठी बेटिंगसारख्या अशा कोणत्याही बेकायदेशीर बाबींना पाठींबा वा उत्तेजन देऊ नका. यातून केवळ भस्मासूरच निर्माण होतात. भस्मासूर निर्माण करण्याच्या पापात निदान तुम्ही तरी जाणूनबुजून वा अजाणताही सहभागी होऊ नका.

बयाच वर्षापूर्वी मी तळेगाव स्टेशनजवळ राहात होतो. रेल्वे पोर्टरसारखे निळे कपडे घातलेले लोक बाजारदराच्या निम्म्या दराने विकायला धान्य घेऊन दारावर येत. त्यांना हे कसे परवडत असेल, याचा मला अचंबा वाटे. त्यावेळी तळेगावमध्ये राहाणाया श्री. अनंतराव चाफेकरांशी - दादांशी बोलता बोलता हा विषय काढल्यावर ते म्हणाले होते ''स्टेशनवर सायडिंगला उभ्या असलेल्या मालगाडीतून हेच लोक रात्री चोरी करतात आणि मुद्देमालही सापडू नये म्हणून चोरीचा तोच माल लगेचच्या लगेच असा पडत्या दरात हातोहात विकून मोकळे होतात. जर आपणाला चोया थांबवायच्या असतील तर निम्म्या दराचा हा मोह सोडून त्यांच्याकडून असा चोरीचा माल घेणे, आपण कटाक्षाने टाळले पाहिजे.''

त्यांची रसद तोडा.

आजही 'मॅच-फिक्सिंग'बाबत दादा हेच म्हणाले असते. ''मॅच फिक्सिंग थांबवणे, आपल्याच हाती आहे. जर आपण बेटिंगचा मोह टाळला तर कोण कशाला निकाल निश्चितीच्या फंदात पडेल? आणि कोणाला उगीचच आपले प्राण कशाला गमावावे लागतील?''

तुम्हीच विचार करून पाहा ना!


रवीन्द्र देसाई

If you find it difficult to post a comment in Marathi, you are welcome to make a contact with me either on desaisays@gmail.com or on 9850955680 / 020 2457 5575.

Let us make this world a bit better, together!

Saturday, October 3, 2009

3) स्वेच्छेने कैदेत!

स्वेच्छेने कैदेत!

आमच्या सोसायटीतील तिसर्‌या मजल्यावरील त्या आजी-अजोबांकडे पाहिले की मला अगदी गलबलून येते. म्हणजे तशी काही त्यांची दैन्यावस्था आहे, असे नाही हं! अगदी चांगल्या खाऊन-पिऊन सुखी अशा एका सुस्कृंत मध्यमवर्गातले ते जोडपे आहे. मुलगा, सून आणि नातवंडेही त्यांच्या जेवण्या-खाण्याकडे आणि औषधपाण्याकडे मनापासून लक्ष देतात, त्यांचा पुरेसा मान देतात; आणि त्यांचे मनही राखतात. काय हवे-नको ते पाहतात. पण तरीही आजी-आजोबा मनातून खंतावलेले असतात. कारण गेली दोन वर्षे ते दोघेही तिसर्‌या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटमधून कधी खाली येऊच शकलेलेच नाहीत. ना देवदर्शनाला, ना कुठे फिरायला, ना नाटक-सिनेमाला, ना कुठे नात्यातल्या लग्ना-मुंजीला, ना कोणत्या सभा-समारंभाला! कसे जाणार? एकवेळ ते तीन मजले उतरणे त्यांना शक्य आहे पण पुन्हा तीन मजले चढून घरी परत जाणार कसे? पहिल्या वेळी मुलाने हौसेने सोसायटीच्या वॉचमनच्या व दोन हमालांच्या मदतीने आजी-आजोबांना खर्चीतून वर आणले होते. पण त्या सार्‌या प्रकरणातील एकूण दगदग, परावलंबन, श्रम आणि खर्च लक्षात आल्यावर तो पहिला प्रयत्नच शेवटचा ठरला. त्या दिवसापासून त्या दोघांचे खाली जाणे आणि पर्यायाने सामाजीकरण जणू बंदच पडले आहे. जणू त्यांना कोणी कैदेत ठेवले आहे - हाऊस ऍरेस्ट!
कहाणी केवळ त्यांची नव्हे, प्रत्येकाची!

पण हे केवळ त्या दोघांचेच दुर्दैव आहे, असे नव्हे. क्वचित एखादा अपवाद वगळता, सर्वच मोठ्या शहरात तीन वा चार मजली इमारतीत वरच्या मजल्यांवर राहाणार्‌या हातपाय धड असलेल्या सर्वच वयोवृध्दांची ही अवस्था आहे. अशा इमारती मूलतः कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांसाठीच बांधलेल्या असल्यामुळे अशा इमारतींना स्वाभाविकपणेच लिफ्टची सोय परवड्याजोगी नसते. पण इमारतीला लिफ्ट नाही म्हणून तेथे राहाणार्‌या माणसांना म्हातारपण येणे थोडेच टळणार आहे? मग अपरीहार्यपणे घरातील जेष्ठ व्यक्तींच्या नशीबी ही अशी अघोषित कैद शेवटपर्यंत येते. आमच्या इमारतीतील त्या आजी-आजोबांची मुले निदान त्यांना विचारत तरी असल्याने त्यांच्या करमणूकीसाठी त्यांनी केबल, डीव्हीडी प्लेअर, साऊंड सिस्टिम, अशी साधनेही त्यांना पुरवली आहेत. पण पिंजरा सोन्याचा असला तरी मोकळ्‌या आकाशातील भरारीचे सुख त्यात थोडेच मिळणार आहे?

हे सारे खरेच अटळ आहे का?

पण म्हातारपण ही जशी अटळ बाब आहे, तशी हातपाय धड असूनही प्रत्येकाच्या बाबतीत ही असली संचारबंदी अपरिहार्य आहे का? निदान मला तरी तसे वाटत नाही. मूलतः कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या गृहनिर्माण संस्थांमध्ये एकेका स्वतंत्र इमारतीत असलेल्या मर्यादित फ्लॅटच्या संख्येत आणि सभासदांच्या मोजक्या उत्पन्नामध्ये प्रत्येक इमारतीला स्वतंत्र लिफ्ट बसवणे परवडण्याजोगे नाही, हे मला एकदम मान्य आहे, पण तरीही थोडा वेगळा विचार केला तर निदान धडधाकट वृद्धांबाबत तरी ही समस्या सहजपणे सोडवता येणे शक्य आहे, याची मला खात्री आहे.

दस की लकडी, एक का बोजा!

कोणत्याही एका गृहनिर्माण संस्थेतील सर्वच इमारती एकाच छापाच्या, एकाच मापाच्या आणि एकमेकींना खेटूनच असतात. सहाजिकच त्यांची उंची सारखीच असते. शेजारशेजारच्या दोन इमारतींच्या गच्चीवर अगदी छोटे कामचलावू पूल टाकून अशा सर्व इमारती एकमेकांशी जोडता येतील. आणि मग एका कोणत्या तरी इमारतीला बाहेरील बाजूने 'कॅप्सूल लिफ्ट' बसवून सर्व इमारतीतील गरजू लोक तिचा वापर करू शकतील. एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल इतपत जरी हे पूल अरूंद असले तरी भागू शकेल. अर्थात त्यामुळे त्यांच्या उभारणीचा खर्चही नाममात्र येईल. शिवाय त्यावर कोणताही आवर्ती (रिकरिंग) खर्च येणार नसल्याने पुढे दरमहाच्या खर्चाचाही प्रश्न येणार नाही. सर्व इमारतींना मिळून एकच 'कॅप्सूल लिफ्ट' बसवायची असल्याने तिचाही भांडवली व आवर्ती खर्च सर्व संस्थेवर वाटला जाऊन प्रत्येक सभासदावर पडणारा बोजा सुसह‌यच ठरेल. अशी सुविधा जर आपण पुरवू शकलो तर एका सोसायटीतील सारी वयोवृद्ध माणसे सकाळ-संध्याकाळ वा दुपारीसुद्धा एकत्र येऊ शकतील. गरजेनुसार तळमजल्यावर येऊ शकतील. अन्य वेळी ते सारे जाण्या-येण्यासाठी गच्चीचा वापर करणार असल्याने वाहनांपासून त्यांना धोका उरणार नाही. त्याना मोकळेपणे फिरता येईल, एकमेकांकडे जाता येईल, पाय मोकळे करता येतील, समवयस्कांशी संवाद साधता येईल. त्यांची दुर्लक्षितपणाची व एकाकीपणाची भावना कमी होईल. त्यांचे संध्याछायेतील जीवन अधिक सुसह‌य होईल.

चिंती परा, ते येई घरा!

आणि खरे सांगू का, घरातील वयोवृद्धांसाठी अशी सोय आपल्या सोसायटीत आपण आजच करू या. त्यात आपलाच फायदा आहे. एक तर दिवसेदिवस वाढत्या महागाईत काम जितके लवकर करू तितके ते आपल्याला पैशांच्या दृष्टीने स्वस्तातही पडेल. आणि दुसरे म्हणजे अखेर कधीतरी आपणही म्हातारे होणारच आहोत की! त्यावेळी आपली मुलेबाळे आपली सोय करतील की नाही, आपल्याला बाहेर जाता येईल की नाही, याची चिंता करण्यापेक्षा आपली आपणच स्वतःची अशी भविष्यकालीन सोय लावणे, अधिक चांगले! नाही का?

दुसर्‌यांसाठी खड्डा खणणारा स्वतःच त्या खड्ड्यात पडतो, असे म्हणतात. तसे असेल तर मग दुसर्‌यांसाठी फूलझाडे लावणार्‌यांवर पुष्पवृष्टीच होईल, यात काय नवल?

रवीन्द्र देसाई

दि. ९.१२.२००६

If you find it difficult to post a comment in Marathi, you are welcome to make a contact with me either on desaisays@gmail.com or on 9850955680 / 020 2457 5575.

Let us make this world a bit better, together!

Friday, October 2, 2009

2) 'थर्ड डायमेन्शन!'

साधनसामग्रीची (रिसोर्सेस) टंचाई तीव्र असलेल्या आपल्यासारख्या विकसनशील देशात, तिचा वापर अत्यंत कल्पकतेने, बहुविधपणे आणि पूर्णांशाने करता येणे, अत्यावश्यकच आहे. आपली प्रगती करण्यासाठी आणि सर्वांना सुखसमाधानाने जगण्यासाठी ती जणू एक पूर्वअटच (प्रि-कंडिशन) आहे. या दृष्टीने मी आज आपणा सर्वांसमोर विचार-मंथनासाठी एक कल्पना ठेऊ इच्छितो.

सर्वच रस्त्यांवर पादपथ बांधणे पालिकेला शक्य नाही;

वाहनांच्या वाढत्या संख्येच्या प्रमाणात शहरातील रस्ते रूंदीला अपुरे पडत असल्यामुळे होणारे हाल आपण सर्व जण सहन करीतच आहोत. प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ बांधणे कायद्यानुसार पालिकेवर बंधनकारक असले; तरी मुळातच अरूंद असलेल्या रस्त्याचाच आणखी काही भाग फूटपाथसाठी वेगळा काढणे कार्पोरेशनला अशक्य आहे. नगरपालिकेकडे उपलब्ध असलेले तुटपुंजे पैसे लक्षात घेता रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सर्व पक्का बहुमजली इमारती पाडून, सर्वच रस्त्यांवर असे पादपथ बांधणे पालिकेला आज तरी शक्य नाही; कदाचित यापुढेही ते कधी शक्य होणार नाही.

फेरीवाल्यांबद्दल कृतज्ञतेऐवजी वैरभाव!

जिथे आधीपासून पादपथ आहेत, त्यावर फेरीवाल्यांचे आक्रमण झालेले आहे. त्यामुळे पादचारयांना फुटपाथवरून सुरक्षतपणे चालण्याऐवजी, जीव मुठीत धरून आणि जीव धोक्यात घालून रस्त्यावरूनच चालावे लागते आहे. परिणामतः प्रत्यक्षात जरी ते फेरीवाले जनतेच्याच गरजा भागवत असले; तरी जनतेच्या मनात मात्र फेरीवाल्यांबद्दल कृतज्ञतेऐवजी वैरभावच निर्माण झाला आहे.

फेरीवाले अधिकृत की अनधिकृत हा मुद्दाच गौण आहे.

फेरीवाल्यांमुळे अशी अडचण होते, यापेक्षाही अनेकांना ते फेरीवाले अनधिकृत असतात याचाच जास्त राग येतो. तसे पाहता फेरीवाले अधिकृत आहेत की अनधिकृत हा मुद्दा तसा गौणच मानायला हवा. तो व्यवसाय त्यांच्या पोटा-पाण्याचा, पर्यायाने त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. अशा अवस्थेत केवळ जनतेच्या मतांवर निवडून आलो आहोत या जोरावर कुणी कार्पोरेटर, आमदार, खासदार वा मंत्री-संत्री दुसरया कोणाच्या जगण्याचा अधिकार नाकारला जाईल, असे कायदे बनवू पाहात असेल तर तसे करण्याइतके ते कोणीही श्रेष्ठ नाहीत, हे कृपया त्यांनी आणि आपण सर्वांनीही सर्वप्रथम लक्षात घेणे जरूरीचे आहे. उद्या दुर्देवाने बेकारीमुळे आपल्यावर फेरीवाल्याचे काम करायची वेळ आली, तर आपल्यापैकी असे कोण हरीचे लाल असतील की जे स्वतःच्या जीवापेक्षा, हस्तीदंती मनोयात बसलेल्या त्या महाभागांनी केलेले असले एकांगी प्रचलित कायदे श्रेष्ठ मानतील?

'साँप भी मरे और लाठी भी ना टूटे!'

शिवाय बिचारे फेरीवाले स्वकष्टाने घाम गाळून पैसे कमवत आहेत; चोरी-दरोडे-वाटमारी करून पैसे मिळवित नाही आहेत, हे त्यांच्यावर आगपाखड करण्यापूर्वी निदान आपण विसरता कामा नये. त्यामुळे फेरीवाले अधिकृत आहेत की अनधिकृत याचा खल करत बसण्यापेक्षा, त्यांना सामावून घेईल आणि रस्त्याने चालताना आपलाही जीव टांगणीला लागणार नाही, अशी काही तरी 'साँप भी मरे और लाठी भी ना टूटे' पद्धतीची उपाययोजना आपल्याला शोधायला हवी.

एकाला भरल्या पोटी शतपावली करता यावी; म्हणून दुसयाला ताटावरून उठवू नका.

मी फेरीवाला नाही. त्यांचा पुढारीही नाही. त्यांच्या व्यवसायात माझे कोणतेही हितसंबंध गुंतलेले नाहीत. त्यांच्या अडथळामुळे इतरांसारखीच माझीही गैरसोयच होते आहे. पण एका कोणाला भरल्या पोटी शतपावली करायला मोकळी जागा मिळावी म्हणून दुसया कोणाला तरी त्याच्या ताटावरून उठवणे, ही समाजरचना अन्याय्य आहे, असे मात्र मला जरूर वाटते. भूक भागवण्यासाठी मेलेल्या कुत्र्याचे मांस चोरून खाणाया विश्वामित्राच्या करणीलाही उदार अंतःकरणाने क्षमा करणारे आपले कोवळे काळीज, नेमके या फेरीवाल्यांच्या बाबतच इतके कठोर का होते आहे? केवळ आपली स्वतःची थोडीशी गैरसोय होते आहे म्हणून?

पाठीवर मारा, पोटावर नको

समाजातील 'आहे रे' गटाचे प्रतिनिधी म्हणून प्रथम आपण त्या 'नाही रे'वाल्यांची काही तरी सोय लावू आणि मग जर त्यांनी अधिकाच्या हावेपोटी कायदा मोडला तर त्यांना जरूर आणि जबर शिक्षाही करू, कारण त्यावेळी ती शिक्षा त्यांच्या जगण्याच्या अधिकाराच्या मागणीबद्दल नसेल, अन्य कारणांसाठी असेल. ती शिक्षा हे त्यांच्या पाठीवर मारणे ठरेल, पोटावर मारणे ठरणार नाही!

मला रस्त्याची 'तिसरी मिती' ('थर्ड डायमेन्शन') वापरावीशी वाटते.

या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांची, पादचारयांची आणि वाहनचालकांचीही सोय होण्यासाठी आपण रस्त्याची तिसरी मिती वापरावी, असे मी सुचवू इच्छितो. रस्त्याला जशी खूप काही लांबी असते, थोडीफार तरी रूंदी असते; तशी खूप काहीशी उंचीही असते. आपण या उंचीचा विचार अथवा वापरच आजपर्यंत कधी केला नव्हता; कारण तितकी निकडच यापूर्वी कधी भासली नव्हती. जेथे अशी निकड भासली तेथे तो विचार वेगळा प्रकारे अमलातही आणला गेला आहे. उदाहरणार्थ, कलकत्ता व दिल्लीमध्ये असलेली भुयारी रेल्वे हा एका अर्थी रस्त्याच्या थर्ड डायमेन्शनचाच वापर आहे. फक्त लौकिक अर्थाने तेथे रस्त्याच्या 'उंची' ऐवजी रस्त्याच्या 'खोली'चा वापर झाला आहे. असा वापर करण्यासाठी भांडवली खर्च खूपच येतो. गोव्यातील (व आता पुण्यातील!) 'स्काय-बस' हा त्या तुलनेनेच हं, पण 'थर्ड डायमेन्शन'चा थोडा कमी खर्चात होणारा प्रस्तावित विचार आहे. तरीही तो खर्चसुद्धा कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी अवाढव्यच आहे.

सामाजिक न्यायाच्या दृष्टीने गौण बाब!

सर्व देशाचा विचार करता, तीव्र आर्थिक टंचाईमुळे सर्वसामान्य जनतेसाठी पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा, प्राथमिक शिक्षण, सिंचन, निवारा अशा जीवनावश्यक गोष्टींसाठीही पुरेशी तरतूद शासनाला करता येत नसता, मुळातच अशा एखाद्या छोटाशा भागात, वरील बाबींच्या तुलनेत गौण असलेल्या वाहतुकीसारख्या बाबीसाठी, आणि त्यातूनही फ्लाय-ओव्हर वा स्काय-बस सारख्या प्रकल्पांसाठी इतक्या मोठा प्रमाणात पैसे गंुतवणे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सर्वथा अयोग्यच आहे. म्हणूनच अशी अनाठाई व अन्याय्य गुंतवणूक टाळूनसुद्धा, रस्ते मात्र अधिक रूंद भासतील असे 'स्वस्त आणि मस्त' काही करता येते का, ते आपण पाहू.

गच्च्यांचे बनवूया हॉकर्स-झोन्स!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा इमारती असतात. त्यांच्या गच्च्यांचा व्यापारी उपयोग करायला परवानगी नसल्याने बहुतांशी गच्च्या निरूपयोगी म्हणून कुलूपबंद अवस्थेत पडून असतात. प्रमुख रहदारीच्या रस्त्यांवरील यातील काही ठराविक व मोठा गच्च्या आपण 'हॉकर्स झोन' म्हणून वापराव्यात. वाहतुकीला काडीचाही अडथळा न करता, अशा गच्च्यांवर आपापली दुकाने थाटून फेरीवाले व पथारीवाले सुखाने आपली रोजी-रोटी तेथे कमवू शकतील, असे मला वाटते.

पण इतक्या पायया चढून गच्चीवर जाणार कोण?

कोण म्हणजे? तुम्ही, मी, सारेच जण!

घाबरू नका. तुमचे वय, तुमचे वजन, तुम्हाला असलेला हार्ट ट्रबल, संधीवात, जीना चढताना तुम्हाला पडणारे श्रम आणि लागत असलेली धाप, या सहाही गोष्टी माझ्या चांगल्या लक्षात आहेत. तरीही मी असे सुचवतो आहे, याचे कारण 'हॉकर्स झोन' म्हणून वापरल्या जाणारया अशा प्रत्येक गच्चीवर जाण्यासाठी पालिकेने किंवा सरकारने इमारती बाहेरून 'कॅप्सूल लिफ्ट' मोफत बांधून देणे, मला अपेक्षितच आहे. मग तुम्हाला कसला आलाय त्रास?

पालिकेच्या किंवा सरकारच्या खर्चाने इमारती बाहेरून 'कॅप्सूल लिफ्ट'!

नाही तरी भुयारी रेल्वे, स्काय बस, फ्लय ओव्हर किंवा अन्य काही सोय करायची म्हटले की कार्पोरेशन किंवा शासनच पैसा खर्च करणार असते ना?. मग त्या ऐवजी अशा काही लिफ्टही कार्पोरेशनने किंवा शासनानेच बसवून द्याव्यात, इतकेच! आणि तरीही हा खर्च इतर खर्चांच्या मानाने इतका किरकोळ असेल की कदाचित आमच्या नगरपित्यांना इतक्या किरकोळ खर्चावर सही करायलासुद्धा लाज वाटेल!

पुणेरी बाणा सोडू नका!

बाकी सारा तपशील अगदी सविस्तर सांगतो; अर्थात पुढच्या लेखात! पण तोपर्यंत तुम्ही या सूचनेच्या विरोधातले मुद्दे तरी शोधून ठेवा. कारण कोणीही आणि कितीही चांगली कल्पना मांडली आणि आपण विरोध करून ती फेटाळली नाही, तर आपल्याला 'पुणेरी' कोण म्हणेल? पण लक्षात ठेवा हं, जमिनीच्या या तिसरया मितीचा वापर आपण आजवर जरी रस्त्यांसाठी केलेला नसला तरी बहुमजली इमारतींच्या रूपाने आपण जमिनीच्या या तिसरया मितीचा वापर गेली शेकडो वर्षे राहाण्यासाठी किफायतशीरपणे करतच आलो आहोत. मी फक्त आता या तिसया मितीचा तसाच वापर हॉकर्स-झोनसाठी करावा, असे सुचवतो आहे, इतकेच!


रवीन्द्र देसाई

If you find it difficult to post a comment in Marathi, you are welcome to make a contact with me either on desaisays@gmail.com or on 9850955680 / 020 2457 5575.

Let us make this world a bit better, together!

Thursday, October 1, 2009

1) नाही तर पैसे परत!

नाही तर पैसे परत!

आपल्याला सगळे काही कळते असा मी कितीही आव आणत असलो; तरी मला सगळ्‌याच गोष्टी कळतात असे नाही. उदाहरणार्थ, राष्ट्रपती किंवा पंतप्रधान एखादा प्रकल्प राष्ट्राला अपर्ण करतात म्हणजे नेमके काय करतात? प्रकल्प राष्ट्राला अपर्ण करण्यापूर्वी ती काय त्यांची खासगी मालमत्ता असते का? तसे नसेल तर राष्ट्रीय संपत्तीतूनच निर्माण झालेला प्रकल्प राष्ट्रालाच अर्पण करून ते नेमके काय साधतात? कॅमेर्‌यासमोर मिरवायची संधी? कोण जाणे! तेवढापुरती तरी माझी मती चालत नाही. स्टॅलीन, हिटलर वगैरेंची बात तर औरच होती. ते स्वतःच स्वतःला सर्वोच्य किताब अपर्ण करून यायचे. पण ती बाब निदान समजण्याजोगी तरी आहे. नंतर आपल्याला कोणी काळे कुत्रेसुद्धा विचारणार नाही याची त्यांना मनोमन खात्री असल्यामुळेच ते तसे करत असावेत. जनतेच्या पैशाने जिवंतपणीच स्वतःचे पुतळे उभारणाया आमच्या 'बहेनजी' देखील कदाचित याच भितीपोटी तसे करत असाव्यात. म्हणूनच सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल त्यांना मुळीच टोकू नये.

पण ते जाऊ दे. आपल्या लेखी महत्त्वाची आहे ती ही 'समर्पण' वृत्ती! याच समर्पण वृत्तीला अनुसरून, त्यांच्या पैकी कोणीही आजवर न केलेली एक अत्यंत उदात्त कृती मी आज करणार आहे. आज मी हा माझा 'ब्लॉग' राष्ट्राला अर्पण करणार आहे. ''यासाठी एकदा 'जोरदार टाळ्‌या' झाल्या पाहिजेत'', असे पल्लवी जोशी नक्कीच म्हणाली असती. पण त्यासाठी तुमच्याप्रमाणेच तिनेही हा ब्लॉग वाचणे आवश्यक आहे, एवढीच काय ती किरकोळ अडचण आहे. असो.

या ब्लॉगच्या अभावी ई-विश्र्वाची आमटी आजवर आळणी होती; असा माझा मुळीच गैरसमज नाही. पण माझ्या या ब्लॉगमुळे आता ती अधिकच रूचकर लागेल, एवढी 'गॅरंटी' मात्र मी नक्कीच देईन. नाही तर पैसे परत! अर्थात तशी वेळ माझ्यावर कधीच येणार नाही. कारण मी त्यासाठी तुमच्याकडून मुळात पैसेच घेतलेले नाहीत. बरोबर?

या ब्लॉगमध्ये काय काय असेल?

खरे तर त्यात 'काय असेल' यापेक्षा त्यात 'काय नसेल; याची यादी देणेच कदाचित अधिक सोपे आणि सुटसुटीत ठरेल. पण एक गोष्ट नक्की, कोणीही नाक मुरडावे, असे त्यात काहीच नसेल. असो.

पण असे अंदाज व्यक्त करत बसण्यापेक्षा या पुढे हा ब्लॉग नियमितपणे वाचणे, हेच अधिक चांगले ठरेल.

मग उशीर कशाला?

जे ब्लॉग नियमितपणे 'फॉलो' करायचे, त्या यादीत हा 'ब्लॉग' लगेच नोंदवूनच ठेवा.


रवीन्द्र देसाई.

२ ऑक्टोबर २००९
महात्मा गांधी जयंती.